आशाताई बच्छाव
राम शिंदेंचा विधानपरिषदेतील विजयाबद्दल भिगवणमध्ये जंगी सत्कार
(शिंदेंचा सत्काराला झालेली गर्दी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या)
( युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे) :
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवल्यानंतर राम शिंदेंचा कर्जत- जामखेड मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मतदारसंघात झालेल्या जोरदार स्वागतानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असलेल्या राम शिंदेंचा मतदारसंघाचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवणमध्ये शुक्रवारी ( दि.२४ ) जंगी सत्कार करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांच्या नेतृत्वाखाली सत्काराचे नियोजन करण्यात आले होते.
कोणतेही पूर्वनियोजन नसतानाही अचानक घेतलेल्या या कार्यक्रमालाही झालेली तरुणांची गर्दी अनेकांना आश्चर्यचकीत करून गेली.सोशल मीडियावर त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आल्याच्या पोस्ट फिरत होत्या. मात्र एवढी उस्फुर्त गर्दी होईल. याचा अंदाज कोणालाही आला नाही. मात्र राजकारणातील संयमी , अभ्यासू नेतृत्व असलेल्या आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असलेल्या राम शिंदेंना मात्र लोकांची मोठी सहानुभुती मिळू लागल्याचे हे द्योतक आहे. त्यातच राज्यात घडू लागलेल्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा राम शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील हवा पुन्हा एकदा तापणार याची चुणूकच यानिमित्ताने दिसून येऊ लागली आहे.
यावेळी मदनवाडी चौफुला ते भिगवण ग्रामपंचायत कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तानाजी वायसे, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव,युवा नेते महेंद्र रेडके,माजी उपसभापती संजय देहाडे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनाही जोरदार संघर्ष करावा लागणार असून भूमिपुत्र विरुद्ध आयात उमेदवार असा टोकाचा संघर्ष होताना पाहायला मिळणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर या मतदारसंघाची निवडणूक मोठी चुरशीची ठरली आणि या निवडणुकीत राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राम शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला आता कायमचा पूर्णविराम लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील प्रमुख चेहरा असलेल्या राम शिंदेंची विधानपरिषदेत जोरदार एन्ट्री झाल्याने मतदारसंघातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. याची चुणूकच त्यांच्या मतदारसंघातील स्वागताला झालेल्यागर्दीवरून दिसून येते.त्याचबरोबर रोहित पवारांनी या मतदारसंघातील केलेले अतिक्रमण आता स्थानिकांना रुचत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळेच भूमीपुत्र असलेल्या राम शिंदेंना जनतेचा उस्फुर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.