आशाताई बच्छाव
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
बुलढाणा विशेष प्रतिनिधी :—प्रकाश खंडागले
महाराष्ट्रात सध्या निसर्गाने थैमान घातले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतमाल उध्वस्त झाला आहे. एकीकडे बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला, तर दुसरीकडे पावसाच्या अतिरेकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत चालले आहे.
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे राज्य शेतकी विभाग प्रमुख यांनी आज संघटनेतर्फे सरकारकडे तातडीने मागणी केली की,
➡️ महाराष्ट्रात त्वरित दुष्काळ जाहीर करण्यात यावा
➡️ शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी
➡️ व कर्जमाफीसह इतर दिलासा योजनांचा लाभ देण्यात यावा.
“आज शेतकरी शेतात उभ्या पिकाकडे पाहून रडतो आहे. घरातील संसार चालवणे अवघड झाले आहे. शेती हीच शेतकऱ्यांची जीवरेखा आहे, पण निसर्गाच्या कोपामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळणे हीच खरी वेळेची गरज आहे,” असे मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, सरकारने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठोस पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांचा रोष उफाळून येईल.
“बळीराजाचा आक्रोश सरकारने ऐकावा आणि महाराष्ट्राला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची आर्त मागणी आहे.”






