आशाताई बच्छाव
टिटाणे माळमाथा परिसरात पावसाची रिपरिप
शेती कामांचा खोळंबा
साक्री, संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ धुळे नंदुरबार:तालुक्यातील टिटाणे परिसरात गेल्या १५ दिवसांपासून रोजच रिमझिम पाऊस होत आहे. जमिनीचा वाफसाच होत नाही. निंदणी, कोळपणी करूनही शेतात तण ‘जैसे थे’ होत असल्याने अव्वाच्या सव्वा मजुरी निंदणीसाठी लागत आहे.
यावर्षी पावसाचा बदललेला रिमझिम पॅटर्न तणपोषक ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हवामान बदलाचा यंदा विचित्र अनुभव येत आहे. एकीकडे पीक बहरात असले तरी शेतात तण वाढले आहे. नुसत्या रिमझिम पावसामुळे शेताबाहेर पाणी निघाले नाही. नद्या, नाल्यांना पाणी गेले नाही.
लहान-मोठे पाझर तलावही कोरडेच आहेत. रोजच्या रिमझिम पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांना कीटकनाशक फवारणी करताना तारेवरची कसरत ठरत आहे. फवारणीनंतर पाऊस येत असल्याने कीटकनाशक धुतले जात आहे. यामुळे व ढगाळ वातावरणामुळे मावा, तुडतुडे व फुलकीडे (थ्रीप्स) व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसाच्या खालोखाल मका क्षेत्र लागवडीखाली आहे. निदान त्यात तणाचा बिमोड करणारे प्रभावी
तणनाशक आहे. कापसात उगवलेल्या तणासाठी मात्र तणनाशकाला मर्यादा आहेत. तण लहान असतानाच तणनाशकाचा फायदा होतो. अलीकडे कापूस पिकात मोठ्या प्रमाणावर उगवणारे तण तणनाशकाद्वारे मरत नाहीत. ग्लायकोसेफ आदी घटक असलेल्या घातक तणनाशकाचा मर्यादेबाहेर वापर सुरु आहे. तो शेतीसाठी धोकादायक समजला जातो. तण वाढीच्या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत.






