आशाताई बच्छाव
“विजेचा खेळ थांबवा, गाठ माझ्याशी आहे!” — आ. अंतापूरकरांचा महावितरणला इशारा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर परिसरात वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींना अखेर आमदार जितेश अंतापूरकर यांनी आवाज दिला. महावितरणच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. “विजेचा खेळ थांबवा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे!” असा थेट इशारा त्यांनी दिला.
आमदार अंतापूरकर यांनी आज आपल्या कार्यालयात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वीज व्यवस्थापनातील गोंधळ, वेळेवर देखभाल न होणे, तांत्रिक अडचणींचे समाधान न होणे, तसेच नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना कडक शब्दांत धारेवर धरले.
“नागरिकांशी थट्टा खपवून घेतली जाणार नाही. वीज ही केवळ सेवा नाही, तर जनतेचा मूलभूत हक्क आहे. वेळेत सेवा मिळाली नाही, तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,” असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि अन्य संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते. या दरम्यान आमदारांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत, तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही दिल्या.
बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी विजेच्या नियमित पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आश्वासन दिले. लवकरच सुधारणा होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, देगलूर परिसरातील नागरिकांनी आमदार अंतापूरकर यांच्या या ठाम भूमिकेचे स्वागत करत, लवकरच विजेची समस्या सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.