आशाताई बच्छाव
ग्रामसभा व मासिक सभा न घेता निधीचा गैरव्यवहार ? चिंचोली उपसरपंचाचे आमरण उपोषण अतनूर लातूर/ प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयात सन २०२१ ते सन २०२४ कालावधीत ग्रामसभा व मासिक सभा न घेता बनावट ठराव तयार करून बनावट कामे दाखवून खोटी बिले उचलली तसेच यावर झालेल्या दि.१८ फेब्रुवारी २०२५ चौकशीचा अहवाल तात्काळ देण्यात यावा. तसेच सन २०२१ ते २०२४ कालावधीतील ग्रामसभा व मासिक सभा ठरावांच्या सांक्षाकित प्रति तत्कळ देण्यात याव्या व संबंधित दोषी सरपंचास अपात्र करणे व ग्रामसेवक एफ.एफ.शेख, जळकोट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दोषींना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवार दि.२४ मार्च पासून पंचायत समिती जळकोट कार्यालयाच्या समोर चिंचोलीचे उपसरपंच राजेंद्र माधवराव बंडरे, ग्रामपंचायत सदस्य गणपती दत्तात्रय हुंजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यांनी यापूर्वी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट सह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री, समाज कल्याण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, सह जिल्हाधिकारी लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय लातूर यांना अनेक वेळा लेखी निवेदने दिलेले आहेत. तसेच त्या कार्यालयाकडून तारखेला प्राप्त झालेल्या नोटीसी प्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रेखा बिरादार व ग्रामसेवक एफ.एफ.शेख आणि विस्तार अधिकारी पंचायत समिती जळकोटचे शिवकांत पटवारी यांनी संगणमत करून चिंचोली येथील १५ व्या.वित्त आयोग, ग्राम स्वच्छता अंतर्गत चिंचोली ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय मिळालेल्या रक्कमेतही आर्थिक गैरव्यवहार केलेला असून आणि ग्रामनिधी व विविध निधी योजना यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. असे वेळोवेळी आपल्या कार्यालयास पुराव्यासहित पत्रव्यवहार करूनही कळविण्यात आले असतानाही त्यावर आजपर्यंत कसलीही प्रकाराची चौकशी करण्याचे कष्ट संबंधित कार्यालयाकडून व संबंधितांनी घेतलेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा न बसतात सरपंच, ग्रामसेवक व विस्ताराधिकारी आजही राजरोसपणे भ्रष्टाचार करताना दिसून येत आहेत. यामुळे असे दिसते की, आपले लक्ष अजिबात नाही याकडे किंवा या सगळ्या प्रकाराला आपला छुपा पाठिंबा असू शकतो. त्यामुळे चिंचोली ग्रामपंचायतीत होत असलेला भ्रष्टाचार व विविध निधी, योजना, अनुदानातील आर्थिक गैरव्यवहार थांबवायचे नाव घेत नाही, या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषीवर कायद्याने योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत उपसरपंच राजेंद्र माधव बंडरे, ग्रामपंचायत सदस्य गणपती दत्तात्रय हुंजे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय किशन बिरादार, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा सुधाकर गायकवाड यांनी दि.२४ मार्चपासून जळकोट पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केले आहे.