आशाताई बच्छाव
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत सरकारला केव्हा कळणार ? -वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 24/12/2024
बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज पंधरा दिवस उलटून गेले असले तरी मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. यावरून सर्वसामान्य जनतेच्या जीवाला सरकार कवडी मोल किंमत देत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच ठिकाणी सरपंचा ऐवजी एखादा मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत असा प्रकार घडला असता किंवा त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली असती तर आरोपी असेच मोकाट फिरले असते का ? असा प्रश्न अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राज्य शासनाला विचारला आहे. सरकारच्या या संवेदनाहिन वागणुकीवरुन सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी किती जागृत व तत्पर असल्याचा प्रत्यय येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात रोज खून, हत्या ,दरोडे, चोऱ्या ,विनयभंग, व बलात्काराच्या अनेक घटना घडतात परंतु राजकीय दबावापोटी आणि विकलेल्या पोलीस यंत्रणेमुळे गुन्हे उघड होत नाही. गुन्हेगार अटक केले जात नाहीत .गुन्हेगार दादा-भाऊ यांच्या जोरावर मोकाट फिरतात यामुळे गुन्हेगारी कमी होण्याऐवजी अधिक प्रमाणात वाढली आहे. विनाकारण निष्पाप लोकांचे बळी जात आहेत याकडे मात्र सरकारला लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली या हत्तेचे केवळ राजकारण केले जात असून मुख्य सूत्रधार आरोपी मोकाट फिरत आहेत. मग राज्याचा गृह विभाग काय झोपा काढत आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या या कृतीवरून सरकारच असे कृत्य करण्यास प्रोत्साहन देतं की काय ? असा संशय निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण व त्यांची निर्घृण हत्या यामध्ये जिल्ह्याचे पोलीसही सहभागी होते त्यांनीच गुन्हेगारांना संरक्षण दिले आणि पळून जाण्यास मदतही केली असल्यामुळे संबंधित पोलिस अधिकारी यांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केली आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कुठलीही जात नसते गुन्हेगारी हीच त्याची जात असते. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातील जनता असुरक्षित असून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन सत्ता जरी मिळाली असेल परंतु दुसरीकडे लाडक्या बहिणीचे कुंकू पुसण्याचे काम केले जात आहे .त्याच गुन्हेगारांना सरकारचं अभय मिळत असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींच्या कुंकू वाचविण्याची जबाबदारी स्वीकारावी व लाडक्या बहिणींच्या मनातील भीती दूर करावी यासाठी राज्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणावी लागेल त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन कृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव देशमुख यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला तो सार्थ करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असून राज्यातील सर्वच मंत्र्यांनी याविषयी आवाज उठविण्याची गरज आहे .एकही मंत्री या सरपंच देशमुख यांच्या निर्घुण हत्तेच्या विरोधात बोलायला तयार नाही ही बाब निश्चितच मान शर्मेने खाली घालायला लावणारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केवळ सत्ता उपभोगायची आणि जनतेचा वापर करायचा आणि फेकून द्यायचं ही कृती लाजिरवाणी आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत ते मोकाट का फिरत आहेत ? त्यांना अटक करण्यास विलंब का होतो ? याविषयी सर्वच मंत्रिमंडळाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची याविषयीची कामगिरी म्हणजे केवळ टोलवाटोलवी असून राज्याच्या दृष्टीने लांछनास्पद असुन जनसामान्यांच्या मनात चीड निर्माण करणारी कृती राज्य शासनाची आहे. यामुळे सर्वसामान्य राज्यातील जनतेच्या मनात राज्य शासनाच्या विरोधात फार मोठी चीड निर्माण झालेली आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितलं.






