Home सामाजिक चिंता

चिंता

240
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_200238.jpg

चिंता

चिंता ही चितेसमान असते असे आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे.आपल्याला वाटणारी अनामिक भीती, मानसिक ताण अशा प्रकारच्या व्याधीला आपण चिंता म्हणतो.चिंता माणसाला जडली की त्याचा सर्वप्रथम निद्रानाश होतो.सारखी धडधड होणे, शरीरात वेदना जाणवणे, श्वासोच्छ्वास करताना त्रास होणे अशा कितीतरी तक्रारी शरीरात उद्भवतात.सतत चिंता करीत बसल्याने माणूस कधीकधी भ्रमिष्टासारखा सुद्धा वागतो.त्याची भूक- तहान हरपते.जीवनातील आनंद उपभोगण्याची क्षमता कमी होते.चिंता अशी गोष्ट आहे ज्यामुळे चिंता करणारी व्यक्ती इतर लोकांशी नीट वागू शकत नाही.अशी व्यक्ती सतत चिडचिड करीत असते.लहानसहान गोष्टींवरून वाद निर्माण करते.अति चिंता करणा-या व्यक्ती सतत आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार असे नकारात्मक विचार करीत असतात.त्या व्यक्तीच्या बोलण्यातून, वागण्यातून सतत चिंताग्रस्त अवस्था दिसत असते.नवीन काम करताना ते काम आपल्याला जमेल की नाही असा विचार त्या व्यक्तीच्या मनात सतत येत असतो.म्हणजेच चिंताग्रस्त व्यक्तीचा आत्मविश्वास कमी झालेला असतो.थोडा कुठे काही आवाज झाला तरी ती व्यक्ती घाबरते.अशी व्यक्ती मनाची एकाग्रता करू शकत नाही.इतकेच काय,पण रोजची कामे करताना देखील सतत भविष्याचा विचार त्या व्यक्तीच्या मनात चालू असतो.अशा चिंताग्रस्त व्यक्तीला कित्येक गोष्टी लक्षात राहत नाही.त्यांना कधीकधी अंगात कंप सुटणे, अचानक घाम येणे,ओकारी आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.अश्या व्यक्ती इतरांशी बोलताना रागाने बोलताना दिसतात.काही व्यक्ती अति चिंतेमुळे आत्महत्या सुध्दा करतात.समोरची व्यक्ती आपल्याला टोचून बोलते असा भ्रम चिंताग्रस्त व्यक्तीला होत असतो.
सतत चिंता करणे कधीकधी मानसिक आजारालासुध्दा आमंत्रण देते.त्यामुळे कित्येकदा त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.चिंता एक विकार आहे.माणसाला जेव्हा हा विकार जडतो तेव्हा तो विषाप्रमाणे त्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतो.असा व्यक्ती कधीही आनंदी राहत नाही.दुस-यांबद्दल नेहमीच त्याच्या मनात संशय असतो.लोकांमध्ये जाणे,त्यांच्याशी गप्पा करणे त्याला नकोसे वाटते.अशा व्यक्तीचे शरीर आणि मन थकलेले असते.चिंता मनुष्याला विनाशाकडे घेऊन जाते.चिता आणि चिंता यात फक्त एका बिंदूचा फरक आहे.चिता मृत शरीराला आणि चिंता जिवंत माणसाला जाळत असते.आजच्या धावपळीच्या जगात अनेक लोक चिंताग्रस्त आहेत.कोविडच्या काळात आपण पाहिले की अनेक लोक मानसिक व्याधीने ग्रासले होते.याला एक मुख्य कारण म्हणजे कोविडमुळे होणारे मृत्यू.अनेक लोक या काळात डिप्रेशनमध्ये गेले होते.सतत चिंता करूनच चिंता वाढत असते.जी वस्तूस्थिती आहे तिचा स्विकार करून आयुष्यात पुढे चालत राहिल्यास मनाला आणि पर्यायाने तनाला त्रास होणार नाही.यासाठी स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
जीवन संपूर्णतः चिंतामुक्त होऊ शकत नाही.पण स्वतःला काहीतरी चांगली सवय लावून घेऊन त्यासाठी वेळ दिला की चिंता नक्कीच कमी होईल.चिंतेचे चिंतन कशाला हवे? फक्त स्वतःचा विचार न करता इतरांच्या भल्यासाठी सुध्दा प्रयत्न केले की जीवनामध्ये सकारात्मकता आपोआप येते.स्वत: ला एखाद्या कामात झोकून दिले की त्यात आनंद मिळतो आणि चिंता करत बसायला वेळच मिळत नाही.त्यामुळे ताणतणाव कमी होतात आणि शांतीचा अनुभव घेता येतो.चिंता अटळ मानवी भावना आहे.प्रत्येक व्यक्तीनुसार ती कमीजास्त असते.पण तिचा अतिरेक होता कामा नये.चिंता मानसिक बदल घडवून आणते आणि व्यक्तीच्या वागण्या, बोलण्यातही बदल घडून येतो.अति चिंताग्रस्त असल्याने निरनिराळे आजार जडतात.तथापि,चिंतेवर मात करून जीवनात सकारात्मकतेकडे वळणे ही सर्वात सुंदर भावना आहे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleबोधकथा….
Next articleमराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन निलंबित करा – माजी आमदार संतोष सांबरे यांचे गृहमंत्री व पोलीस अधिक्षकांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here