राजेंद्र पाटील राऊत
प्रेम म्हणजे काय?
**************************
प्रेम हा शब्द कानावर पडताच प्रत्येकाच्या चेह-यावरील भाव बदलतात.एक वेगळाच भाव चेहऱ्यावर झळकू लागतो.चेहरा आनंदी दिसू लागतो.डोळ्यात पाहणा-याला समोरच्याच्या डोळ्यात अनोखी चमक दिसू लागते.सर्वांनाच बहुदा प्रेम या विषयावर बोलायला आवडतं.प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या निराळी असते कारण प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो.प्रेमाकडे कोण कुठल्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो यावर प्रेमाची व्याख्या अवलंबून असते
प्रेम फक्त व्यक्तीसोबतच असते असे नाही, तर ते एखाद्या वस्तूवर,प्राण्यावर देखील होत असते.प्रेम म्हटले की सर्वप्रथम आठवण येते ती राधा आणि कृष्ण यांची.राधा-कृष्णाप्रमाणे अगदी नि: स्वार्थी,निर्मळ आपलं प्रेम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं.प्रेम म्हणजे नि: स्वार्थ भावनेने आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा काही प्रमाणात का असेना त्याग करणे.प्रेम जीवन देतं, जीवन घेत नाही.तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे समोरच्याने स्वीकारणे म्हणजे खरे प्रेम.प्रेम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारं असलं पाहिजे.कितीही संकटे आली तरी मागे न फिरणारं.प्रेम एक पवित्र भावना आहे.जगात नि:स्वार्थी प्रेम मिळणे खूप कठीण आहे.
आई- वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम,मुलांचे आई-वडिलांवरील प्रेम,भावा-बहिणीचे प्रेम,मुक्या प्राण्यांचे प्रेम हे नि: स्वार्थी प्रेमाचे प्रतीक आहे.नि: स्वार्थ प्रेमासोबतच निरागस प्रेमही हवे.
विश्वास,आदर, आपुलकी, सहानुभूती, काळजी इत्यादी भावनांच्या मिश्रणाने तयार होणारे प्रेम म्हणजे निरागस प्रेम.या जगात प्रत्येकालाच प्रेम हवं असतं.प्रेमाशिवाय जगणे कठीण आहे.एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या नात्यांमुळे जीवन सुखकर होतं.
**************************