Home नांदेड शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या पिक पद्धतीवर भर द्यावा – मुख्य...

शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या पिक पद्धतीवर भर द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर –घुगे

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20221124-WA0068.jpg

शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर जास्त उत्पादन

देणाऱ्या पिक पद्धतीवर भर द्यावा

– मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर –घुगे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 23 :– विहीरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याच्या शाश्वतीप्रमाणे अधिकचे उत्पन्न घेणे शक्य होते. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व या पाण्याचा न्याय्य वापर करता आला पाहिजे. कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या पिक पद्धतीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत पूर्ण झालेल्या विहीरींपैकी प्रातिनिधीक स्वरुपात 75 विहीरींचे जलपुजन आज करण्यात आले. याअंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील कासारखेडा येथील मनोज प्रल्हाद हिंगोले यांच्या विहिरीचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेट्टे, जिल्हा कृषि अधिकारी विघयो भाग्यश्री बबनराव भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल परिहार, सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती सरोदे, कृषि अधिकारी (नियोजन) पी.आर. माने, पंचायत समिती कृषि अधिकारी प्रल्हाद जाधव, कृषी विकास अधिकारी छाया देशमुख, धनराज शिंदे, सतीश लकडे, मांजरमकर, सरपंच सौ. सुरेखा शिंदे, ग्रामसेवक मारोती बंडावार व ग्रामस्थ यांची यावेळी उपस्थिती होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समृध्दी आली आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा उपयोग ऊस इत्यादी पिकासाठी न करता इतर कमी पाणी लागणाऱ्या पिकासाठी करावा. यात जमीनीच्या प्रतीप्रमाणे फळ लागवड, फुलशेतीकडे व भाजीपाला उत्पादनाकडे वळले पाहिजे. विहिरींचे लाभधारक शेतकरी आपल्या पिक नियोजनातून इतरासाठी प्रेरक अशी प्रगतीशिल शेती करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषि विकास योजना (अनु.जाती /जमाती) या तिनही योजनांच्या सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील एकुण 860 विहीरींचे कामे पुर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या संकल्पनेतुन मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्य या पूर्ण झालेल्या विहीरींपैकी 75 विहीरींचे जलपुजन आज रोजी एकाच दिवशी संपुर्ण जिल्हयात करण्यात आले. उर्वरित सर्व विहीरींचे जलपुजन जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख तसेच सर्व गट विकास अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here