आशाताई बच्छाव
50 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
कोल्हापूर,राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क: खोटा वाहन अपघात दाखवून मोटर सायकल व चालक बदलून, बनावट दस्तावेज तयार करून न्यायालय व विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न सीआयडी तपासात उघड झाला आहे.याप्रकरणी विमा कंपनीकडून 50 लाख वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस हवलदारासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तत्कालीन पोलीस हवलदार रमेश बैरू कुंभार, उर्मिला राकेश भारती(रा.भादोले), आप्पासाहेब पाटील(रा.पट्टणकोडोली), धनाजी दत्तात्रय बिडकर(रा.कसबा बीड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.याबाबत सीआयडीच्या पोलीस निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली.हा अपघात 20 ऑक्टोबर 2019 ला झाला होता.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार भादोले येथील डॉ. राकेश दिनकर भारती हे 20 ऑक्टोबर 2019 ला मोटर सायकल( एमएच 09 डी यु 3415) वरून वाठार ते भादोलेकडे जात असताना अपघात झाला.भारती यांच्यावर डायमंड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान या अपघाताचा तपास अंमलदार रमेश कुंभार यांच्याकडे होता.डॉ.भारती यांचा वाहन परवाना, विमा नव्हता.त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून उर्मिला भारती यांनी पोलीस अंमलदार कुंभार यांच्याशी संगणमत केले.आप्पासाहेब पाटील यांची दुसरी मोटर सायकल अपघातात दाखवून ती धनाजी बिडकर चालवत आहे, असे दाखवले.या मोटारसायकलने पाठीमागून ठोकरल्यामुळे अपघात झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवली.त्याच्या आधारावर धनाजी बिडकर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.टाटा ए. आय. जी.विमा कंपनी विरुद्ध अपघाताचा पन्नास लाखांचा दावा दाखल केला होता.याबाबत विमा कंपनीस संशय आल्याने त्यांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली.या याचिकेनुसार न्यायालयाने गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले.तयानुसार पोलीस अधीक्षक डॉ.दिनेश बारी, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाग्यश्री पाटील, पोलीस निरीक्षक वर्षा कावडे यांनी तपास केला.या अधिकाऱ्यांनी चौकशी करून खोटा अपघात झालयाचे व खोटा बनाव झाल्याचे उघडकीस आणले.