आशाताई बच्छाव
सैतवडेत विजेच्या खांबाला बीएसएनएलचा पोल टेकला; दुर्घटनेची शक्यता
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- सैतवडे गावात महावितरण आणि बीएसएनएलच्या निष्काळजी कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. येथील दर्ग्याजवळील महावितरणचा विद्युत पोल आणि बीएसएनएलचा पोल एकत्र टेकले असून यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सैतवडे गावातील खतीब मोहल्ला येथील शेख मोहम्मद दरवेश दर्गे जवळील विजेच्या खांबाला बीएसएनएलचा पोल टेकला आहे. दोन पोल एकत्र आल्याने या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते. याबाबतची माहिती गावातील लोकांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही. ज्यावेळी एखादी दुर्घटना घडेल त्याच वेळी याकडे लक्ष देऊन कारवाई करून प्रश्न सोडवला जाईल पण योग्य वेळी माहिती देऊन सुद्धा या गंभीर विषयाकडे लक्ष न दिले जाणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. संबंधित अधिकारी एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.