आशाताई बच्छाव
पिंपरी गिते शिवारातील पिकांवर ताव मारून पिकांची नासाडी करणारी ५० वानरांची टोळी जेरबंद
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
(परभणी)जिंतूर:- तालुक्यातील पिंपरी गीते येथील गाव शिवारातील पिकांवर ताव मारून पिकांची नासाडी करणारी ५० वानरांची टोळी शनिवार २० ऑगस्ट रोजी जेरबंद करून इतरत्र हलविण्यात आली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून गावात व गावशिवारात वानरांच्या टोळ्यांनी धुडगूस घातल्याने नागरिक वानरांना चांगलेच वैतागले होते. वन विभागाकडे वारंवार वानरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही काहीच उपयोग होत नव्हता. सध्या पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांची खरीपाची पिके जोमात आहेत.
परंतु ४० ते ५० वानरांच्या टोळीने गाव व गावशिवारातच तळ ठोकून पिकांवर ताव मारून पिकांची नासाडी चालवली होती. ऐन भरात आलेल्या पिकांची डोळ्यांसमोर नासाडी होत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी नानासाहेब राऊत यांच्याशी संपर्क साधला. नानासाहेब राऊत यांनी तात्काळ दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी भालचंद्र तळेकर यांच्याशी संपर्क करून यावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली होती.
यावर वनपरिक्षेत्र अधिकारी भालचंद्र तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी गीते येथील वानराची टोळी जेरबंद करण्यासाठी गावाबाहेरील पुलाजवळ शनिवारी पिंजरा लावण्यात आला. यावेळी वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी, संदीप गिरी यांच्या सहकार्याने जवळपास ५० वानरांची टोळी जेरबंद करण्यात आली.