आशाताई बच्छाव
मुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
दोन दिवस अविश्रांत धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. खाडी किनाऱ्यालगत असलेल्या भातशेतीलाही पुराच्या पाण्याने गिळंकृत केले होते. बाजारपेठेतही दोन ते तीन फूट पाणी होते. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापूराची पुनरावृत्ती होणार की काय अशी भीती खाडीभागवासीयांच्या मनात होती. मात्र पावसाने उसंती घेतल्याने हळू-हळू पुराचे पाणी ओसरू लागले आहे.
दहा ते पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली ती ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखासह दोन दिवस अविश्रांत धो-धो बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे पावसाच्या पाण्याविना खडखडाट झालेले नदी-नालेही ओसंडून वाहण्याबरोबरच फुणगूस येथील शास्त्री खाडीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर फुणगूस येथील जुना बाजारपेठेतही पाणी घुसले होते. तर खाडीभागातील परचुरी, फुणगूस, कोंडये, दवखोल, मांजरे, मेढे तर खाडी पलीकडील डिंगणी, पिरणदवणे आदी गावांमधील खाडीलगत असलेल्या भातशेतीतही पुराचे जाऊन हातातोंडाशी आलेली भात शेती पाण्याखाली होती.
दोन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते सर्वत्र जलमय परिस्थितीच एकप्रकारे निर्माण झाली हॊती. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापुराची पुनरावृत्ती होणार ही एकच धास्ती लोकांच्या मनात होती. मात्र पावसाने उशिराने का असेना उसंती घेतल्याने व पुराचे पाणी हळू-हळू ओसरू लागल्याने लोकांच्या मनात गतवर्षोच्या महापुराच्या पुनरावृत्तीची भीती दूर झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.