आशाताई बच्छाव
राजकीय गदारोळातही ठाकरे सरकारचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!!
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. त्यामुळे ठाकरे सरकार सत्तेतून जाणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. मात्र, अशा सर्व गदारोळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 22) मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ते पुढीलप्रमाणे :
ठाकरे सरकारचे महत्वाचे निर्णय
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत अल्पमुदत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यासाठी 2017-18, 2018-19, तसेच 2019-20 या काळातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
2019-20 मध्ये परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना कर्जाच्या मुद्दलाइतकी रक्कम दिली जाणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी दिलेले अल्प मुदत पीक कर्जच त्यासाठी विचारात घेतलं जाणार आहे.
कोरोना काळातील गुन्ह्यांबाबत..
कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याने राज्यात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगारांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने चारित्र्य पडताळणीत अडचणी येत आहेत.
अर्थात, आता हे गुन्हे मागे घेतले जाणार असले, तरी याबाबतचा निर्णय घेताना सरकारी नोकर व फ्रंटलाईन वर्कर यांच्यावर हल्ले झालेले नसावेत, तसेच खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.