आशाताई बच्छाव
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका…
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
20 गुन्हे नोंदवून 20 आरोपींना अटक
2 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा :-दि. 15: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका ठेवला आहे. विभागीय उप-आयुक्त व्ही. पी चिंचाळकर व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 12 ते 14 जून दरम्यान धडक मोहिम राबविण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर कारवाईचा बडगा उगारला.
धडक मोहिमेदरम्यान बुलडाणा शहरातील आंबेडकर नगर, भिलवाडा, बोराखेडी ता. मोताळा, चिखली शहरातील गवळीपूरा, जवळा पळसखेड, लासुरा जहाँगीर, संभापूर शिवार, मोहदरी, शिर्ला नेमाने या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकुण 20 गुन्हे नोंदविण्यात आले व 20 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये 253 लि. हातभट्टी दारु, 4851 लि. रसायन, 17 लि. देशी दारु, 2 लि. विदेशी दारु व दोन मोटार सायकल जप्त करुन 2 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
मोहिमेत निरीक्षक के. आर पाटील, चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे, मलकापूर चे दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, नांदुऱ्याचे एस. जी मोरे, बुलडाणा येथील ए. आर आडळकर, मेहकरचे एस. डी. चव्हाण, चिखली येथील श्री. सोनुने, खामगांवचे आर. के फुसे, शेगांव येथील एन. के मावळे, जवान श्री. पाटील, श्री. निकाळजे, श्री. अवचार, श्री. जाधव, श्री. चव्हाण, श्री. सोळंके, सोनाली उबरहंडे, श्री. सोभागे, श्री. कुसळकर, श्री. देशमुख, श्री. मोरे, श्री. साखरे यांनी सहभाग घेतला.
बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घअना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यसेवन करणाऱ्या नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे.
आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर 1800 833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी, असे आवाहन अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.