राजेंद्र पाटील राऊत
एफडीसीएमच्या नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे तृतीय राज्यस्तरीय अधिवेशनात हृद्द सत्कार.
महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे आयोजन
नागपूर, (वैभव पाटील कार्यकारी संपादक युवा मराठा न्युज)
एफडीसीएमला चालू वर्षात 300 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू प्राप्त झाला असून 160 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हे वर्ष एफडीसीएमसाठी अतिशय चांगले वर्ष ठरले असून त्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांना जाते अशा भावना व्यक्त करीत एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या तृतीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी साई सभागृहात झाले. उद्घाटक वनराई फाउंडेशनचे डॉ. गिरीश गांधी होते तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील होते. मंचावर एफडीसीएम मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन व मुख्यालय) संजीव गौड, श्वेताली ठाकरे, माजी नगरसेविका प्रगती पाटील, एफडीसीमएचे कौस्तुभ भांबुरकर, संघटनेचे कार्याध्यक्ष बी. बी. पाटील, उपाध्यक्ष आर. एस. रोटे व राहूल वाघ, सुनील पोहणकर, कुशाग्र पाठक, प्रवीण ए., व्ही. व्ही. मोरे, टी. एस. चांदेकर, रमेश बोरकुटे, अतुल दुरुगकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांचा वनसंरक्षण व संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हार, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच, अजय पाटील व प्रगती पाटील यांचा संघटनेच्यावतीने सपत्निक सत्कार करण्यात आला.
संघटनेसोबत संवाद राखल्यामुळे कर्मचा-यांची नाडी ओळखता आली. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा सरकारदरबारी पाठपुरावा करून त्या मान्य करून घेता आल्या असे सांगितले. मेडिकल रिअम्बर्समेंटचा लाभ कर्मचा-यांना मिळणार असून पुढच्या दोन तीन वर्षात ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे एन. वासुदेवन यांनी सांगितले. कर्मचा-यांच्या इतरही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
संजीव गौड यांनीदेखील आपल्या भाषणातून वनकर्मचा-यांच्या शक्य तितक्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत एन. वासुदेवन यांचे सत्कारासाठी अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणातून अजय पाटील यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एन. वासुदेवन यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले. वन कर्मचा-यांच्या मुलांचे शिक्षण, पोलिसांच्या धर्तीवर मेडिक्लेमची सुविधा, वनमजुरांची संख्या वाढवावी, फारेस्ट गार्ड, लिपिक व वाहनचालकांचे प्रमोशन, कर्मचा-यांसाठी आरोग्य शिबिरे च कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, आदी मागण्यांवर विचार करण्यात यावा, असे आवाहन केले.
अजय पाटील यांच्या स्वरूपात संघटनेला उत्तम नेतृत्व लाभले असल्याचे सांगत गिरीश गांधी यांनी कुशाग्र बुद्धीच्या ए. वासुदेवन यांनी सामाजिक वनीकरणाबाबतीत जी ध्येय धोरणे राबवली, त्यांचे कौतूक केले. चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांनी जबाबदारी स्वीकारत वनविभाग, कर्मचा-यांना लाभ करून दिला. वासुदेवन यांनी निवृत्तीनंतर नागपुरात स्थायिक होवून विदर्भात मोठ्या प्रमाणात असलेल्या जैवविविधतेसाठी काम करावे. त्यांच्या ज्ञानाचा समाजाला लाभ करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्वेताली ठाकरे यांनी ‘वन आणि पाणी व्यवस्थापन’ विषयावर भाष्य केले. कौस्तुभ कुंडलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. गिरीश गांधी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष आर. एस. रोटे यांनी केले.