राजेंद्र पाटील राऊत
अंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या चार दिवसांपासुन नांदेड जिल्ह्याच्या विविध – भागात ढगाळ वातावरण होते . त्यातच दि .१३ जानेवारी रोजी सायंकाळी मुखेड तालुक्याच्या आंबुलगा (बु) सांगवी , ईटग्याळ, बाऱ्हाळी, जाहूर आदीसह काही भागात वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास गारांचा पाऊस झाला . यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . · हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार , गेल्या चार दिवसांपासुन तसे सर्वत्र ढगाळ वातावर पसरले होते . काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला .यात बाऱ्हाळी परिसरात काल दि . १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट होऊन नंतर सलग एक तास पाऊस झाला . अनेक भागात तर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला . बराच वेळ झालेल्या या पावसामुळे गारांचा सडा पडलेला दिसत होता .
यामुळे शेतातील गुरेढोरे यासह शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे .अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे . रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.