राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तां राखण्यात यश
कोल्हापूर : जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. सुमारे २०० हून अधिक ठिकाणी सत्ता राखण्यात कारभार्यांना यश आले. बहुतांशी सर्वच गावांत स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकला. काही ठिकाणी मातब्बरांना नवख्या तरुणांनी धूळ चारली, तर काही ठिकाणी अनुभवाच्या जोरावर आपला गड राखला.
मतमोजणी केंद्रांत केवळ उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येत होता. मतमोजणी केंद्रांसह परिसरातही पोलिस बंदोबस्त तैनात होता. केंद्रांकडे जाणारे रस्ते ठरावीक ठिकाणी अडविण्यात आले होते. निकाल जसा जाहीर होईल, तसतसे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. गुलालाची उधळण करत कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते. निकालाची माहिती गावात, पै-पाहुणे, मित्रमंडळींना दिली जात होती. पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. एमकेकांची समजूत घालत, पराभवाच्या कारणांची चर्चा करत अनेकजण माघारी फिरत होते. यामुळे गावातही काही भागात जल्लोष आणि काही भागात शांतता असेही चित्र होते.
सत्ताधाी मातब्बरांना अनेक ठिकाणी कडवे आव्हान दिले होते, मतदारांनीही त्यांना साथ दिल्याचे चित्र काही ठिकाणी होते. काही गावात तर नवख्या आघाडीने प्रस्थापतितांना धक्का दिला. काही ठिकाणी मात्र, सत्ताधार्यांवरच गावांने विश्वास ठेवला. जिल्ह्यात सहा जणांचे नशीब चिठ्ठ्यांवर ठरवले. करवीर तालुक्यातील खेबवडे येथे दोन उमेदवारांना समान मते पडली. भुदरगड तालुक्यातील पाच गावात दहा उमेदवारांना समान मते पडली. चिठ्ठ्या टाकून त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
गगनबावडा तालुक्यात ३ ग्रामपंचायतीत सत्ता बदल झाला. पाच ठिकाणी मात्र, जुन्या कारभार्यांनाच गावकर्यांनी पुन्हा संधी दिली. करवीर तालुक्यात १३ ग्रामपंचायतीत नव्या कारभार्यांना संधी देण्यात आली. दहा ठिकाणी मात्र, सत्ता कायम राखण्यात यश आले. शाहूवाडीत १८ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. त्याठिकाणी १४ ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले. पन्हाळ्यात मतदारांनी दहा ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवले.
हातकणंगलेत ९ ग्रामपंचायतीत सत्ता बदल झाला. शिरोळ तालुक्यात मतदारांनी १७ ठिकाणी नव्या कारभार्यांवर विश्वास टाकला. तालुक्यात १७ ठिकाणी सत्ता राखण्यातही विद्यमान सत्ताधार्यांना यश आले. कागल तालुक्यात मात्र, सर्वच ठिकाणी सरमिसळ झाले. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत बहुतांशी ठिकाणी प्रत्येक गटाचे उमेदवार होते, यामुळे सत्तातंर झाले किंवा सत्ता कायम राहील असे चित्र तालुक्यात फारसे दिसले नाही. राधानगरी तालुक्यात चार ग्रामपंचायतीची सत्ता नव्या कारभार्यांकडे मतदारांनी सोपवली.
आजरा तालुक्यात १० ठिकाणी सत्तांतर झाले. दहा ठिकाणी सत्ता राखण्यात सत्ताधार्यांनी बाजी मारली. चंदगड तालुक्यातही आठ ठिकाणी मतदारांनी सत्तातंर घडवून आणले. गडहिंग्लज तालुक्यात २३ ठिकाणी सत्तांतर झाले. १३ गावात मात्र, सत्ता कायम राहीली. भुदरगड तालुक्यात ११ गावात सत्ता बदल झाला. १२५ ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात सत्ताधार्यांना यश आले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .