Home विदर्भ मा. गो. वैद्य यांचे निधन

मा. गो. वैद्य यांचे निधन

127
0

राजेंद्र पाटील राऊत

मा. गो. वैद्य यांचे निधन
नागपूर, दि.२० युवा मराठा न्युज नेटवर्क
विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे काल शनिवार १९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाेत पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.
अंत्ययात्रा आज रविवार २०डिसेंबर रोजी सकाळी ९ .३०वाजता त्यांचे राहते घर- ८० विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-२२ येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतीलमा.गो. वैद्य किंवा बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला.
मा.गो. वैद्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तरोड्यात आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांच्या मावसकाकाने त्यांना नागपुरात पुढील शिक्षणासाठी आणले. अकरावी मॅट्रिकनंतर १९३९ साली त्यांनी नागपूरमधीलच मॉरिस कॉलेजमध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. संस्कृत व गणित हे विषय घेऊन त्यांनी बी.ए.ची परीक्षा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. संस्कृत विषयात एम.ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली.

एम.ए.झाल्यावर मा.गो. वैद्य न्यू इरा हायस्कूल(आता, नवयुग विद्यालय) या शाळेत शिक्षक म्हणून लागले. त्या सुमारास याचदरम्यान महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी डॉ. रघुवीर यांना संस्कृत कोशासाठी दोन मदतनीस हवे आहेत, असे कळल्यानंतर न्यू इरा हायस्कूलमधील नोकरी सोडून त्यांनी संस्कृत कोषाचे काम सुरू केले. मात्र काही कारणाने हे काम सोडावे लागले.

पुढची नोकरी कुर्वे स्कूल मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून आणि त्यानंतरची पब्लिक सर्विस कमिशनच्या ऑफिसात. १९४९ साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लागले. मा.गो. वैद्यांनी सलग १७ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत-इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्यांनी १९६६मध्ये कॉलेजची नोकरी सोडली.

मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते छान शर्ट, पॅंट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही.

हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा.गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपविली नाही. इतकेच नव्हे तर १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले.

मा.गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडल्यामुळे कॉलेजचे फार मोठे नुकसान झाले आहे असे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मोझेस म्हणाले. मात्र दुसरा कसलाही विचार न करता मा.गो. वैद्य हे १९६६मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले.

१९७८ साली मा.गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

Previous articleशहरातील अनधिकृत लेआऊट मधील भूखंडधारकांना अडचणी
Next articleआज २० डिसेंबरला बल्लारपूर बामणीत ओबीसी आरक्षण बचाव परिषद ओबीसींच्या विविध मागण्यांवर विचारमंथन होणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here