राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा पाया आहे – प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील
विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे
मुंबई, दि. १७- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सेलची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९च्या निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. मागील कालखंडात यश-अपयश अनुभवत आपण पक्ष मोठा केला, आजही करत आहोत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असं काम आपल्याला करायचं आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये आपली संघटना असायला हवी, संघटनेने चळवळ करावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी बैठकीला संबोधित करताना राजकारणापेक्षा समजाकार्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे पद कायमस्वरूपी नाही, जो काम करेल त्याला पदावर राहता येईल, एकदा काम करणं थांबलं की पद राहणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला ठेवावी, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास आ. अमोल मिटकरी, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे तसेच विद्यार्थी सेलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.