राजेंद्र पाटील राऊत
एसटी बसस्थानक व आगारामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळ विभागाची सर्व बसस्थानक , आगार आणि गाड्या स्वच्छ ठेवून जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच कोविड पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन१ ते १५ डिसेंबरपर्यंत “स्वच्छता अभियान’ सर्वत्र राबवले जाणार आहे. अभियानात दर दोन तासानी स्वच्छतेची तपासणी होणार आहे. तसेच अचानक तपासणी देखील केली जाणार आहे.
राज्य परिवहन विभागाने बसस्थानकावर नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवासी प्रतिक्षालय, प्रसाधनगृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व ठिकाणी स्वच्छता असणे महत्वाचे आहे. बसस्थानके व आगार परिसर आणि गाड्या स्वच्छ असतील तर प्रवासी वर्गात प्रतिमा उंचावली जाऊ शकते.
तसेच सध्या कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. परंतू बऱ्याच बसस्थानक परिसरात स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात नसल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे १ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
अभियानात आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या नियंत्रणाखालील बसस्थानकांवरील स्वच्छता करून घ्यायची आहे. तसेच स्वच्छतेची प्रत्येक दोन तासांनी वारंवार तपासणी करून घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. तपासणीसाठी आगारातील पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले जाईल. हे कर्मचारी गणवेशात उपस्थित राहतील. प्रत्येक दोन तासानंतर साफसफाई करावी. प्रतिक्षालय निर्जंतुकीकरण केले जावे. दिवसातून किमान दोनवेळा पोचा मारला जावा.
आठवड्यातून किमान एक दिवस प्रतिक्षालय, बसस्थानक धुण्याच्या पावडरने धुवून घ्यावे. दिवे, पंखे दुरूस्ती, प्रवासी आसनाची दुरूस्ती, स्थानकावर कचरापेटी आदी सुविधा ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच वाहनतळाचा परिसरात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावा. ग्रामीण भागातील वाहनतळ देखील स्वच्छ ठेवावा. प्रत्येक ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसेस निर्जंतुकीकरण, प्रसाधनगृहे व चालक-वाहक विश्रांतीगृह आदींसह बसस्थानकांचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे सूचवले आहे. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी अचानक तपासणी केली जाणार आहे. तेव्हा दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .