*महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*
देशात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महिला अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यावरही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची तरतूद या नव्या नियमावलीत करण्यात आली आहे. त्याशिवाय बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांवरील अन्यायाला वाचा फूटण्यास मदत होणार आहे.
हाथरस बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांकडून काही उणीवा राहिल्या होत्या. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नव्या नियमावलीत कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. महिला अत्याचाराच्या प्रकरणात एफआरआय नोंदवणे बंधनकारक आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्याकडे लक्ष द्यावे. एफआयआर दाखल करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशच केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.