🛑 जेव्हा संकट काळात मोदी सरकारचे सुरक्षाकवच बनले शरद पवार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 1 जुलै : ⭕ देशाच्या सुरक्षेबाबत अनेकदा काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे . राष्ट्रीय मुद्द्यांवर जेव्हा काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदी सरकारचे सुरक्षाकवच बनले असल्याचे पाहायला मिळाले.
चिनी सैनिकांसोबत गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. यात भारताच्या कर्नल हुद्द्याच्या लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश होता . दरम्यान, चिनी सैनिकांसबोत संघर्ष करताना हुतात्मा झालेल्या जवानांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे”, अशा आशयाचे ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला.
या घटनेवरून आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. पवारांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला मोठी चपराक मिळाली आहे . चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार स्क्वेअर किलोमीटरचा आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. हे आम्ही विसरू शकत नाही. सध्या त्यांनी आपला भूभाग ताब्यात घेतला आहे की नाही माहिती नाही. परंतु, आपण जेव्हा याबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्याला भूतकाळ माहिती असणं आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेबाबत राजकारण नको,अशा शब्दात पवारांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहे . काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.⭕