आशाताई बच्छाव
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी -अहिल्यानगर येथील ‘विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल’ निर्मित महाविद्यालयाच्या वास्तूचं उद्घाटन संपन्न झाल्यानंतर त्याच संयुक्त कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. विवेक सावंत ह्यांना ‘स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं, त्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केलं.
ज्यांचा आज आपण सन्मान केला ते डॉ. विवेक सावंत – सौ.सावंत, मधुकर भावे, भगीरथ शिंदे, नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे आमचे सहकारी दादा कळमकर, ज्यांनी आजचा हा सोहळा आयोजित केला ते डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, व्यासपीठावरील अन्य मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू-भगिनींनो..
एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. रावसाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे आणि आम्हा लोकांचे कौटुंबिक संबंध होते. देशाच्या शेती खात्याचा मंत्री म्हणून मी १० वर्ष काम केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा शेती मंत्री म्हणून काही वर्ष काम केलं. सबंध देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात जे काही बदल झाले, संशोधनं झाली त्याच्याशी सुसंवाद ठेवण्याचं काम मी सातत्याने त्या काळात केलं होतं. ते पाहिल्यानंतर अण्णासाहेबांचं कर्तृत्व आणि दृष्टी हे आपल्याला जवळून बघता येतं. या देशामध्ये Indian Council of Agricultural Research (ICAR) नावाची संस्था आहे. या संस्थेचा मी १० वर्ष अध्यक्ष होतो. या संस्थेमध्ये तुम्हाला गंमत वाटेल, ५ हजार शास्त्रज्ञ काम करतात. ते वेगवेगळ्या विषयांचे असतात. कुणी पिकाच्या संबंधिचं आहे, कुणी गव्हावर काम करतं, कुणी ऊसावर काम करतं, कुणी फळांवर काम करतं, कुणी केळींवर काम करतं, गाईंवर काम करतं, म्हशींवर काम करतं. तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात तर उंटांवर सुद्धा काम करणाऱ्या संस्था आहेत. अशा अनेक संस्था आणि त्या संस्थांमध्ये वाहून घेणारे शास्त्रज्ञ हा माझ्या मते, भारताचा मोठा ठेवा आहे. या सगळ्या लोकांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं यासाठी ज्यांनी प्रचंड योगदान दिलं त्या मालिकेमध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख हा करावा लागतो. म्हणून मला आनंद आहे की, दिल्लीच्या Indian Council of Agricultural Research (ICAR) यांची पुसाला एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेमध्ये संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारा एक नवीन विभाग आम्ही सुरु केला. त्याचा निर्णय मी घेऊन टाकला की, त्या विभागाचं नामकरण हे अण्णासाहेबांच्या नावानं असलं पाहिजे. आज पुसा इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर जे जगातील दोन-तीन मोठे शास्त्रज्ञांचं स्मरण केलं जातं त्या मालिकेमध्ये अण्णासाहेब सुद्धा होते.
अण्णासाहेब आणि रावसाहेब हे दोघेही स्वातंत्र्याच्या चळवळीत होते. दोघेही विचारांनी डाव्या विचारसरणीचे होते. एक काळ असा होता की, नगर जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा नेतृत्व असलेल्या अनेकांचा हा जिल्हा. अनेक मोठमोठी माणसं या ठिकाणी होऊन गेली. त्यामध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख करावा लागेल, रावसाहेबांचं नाव घ्यावं लागेल, प्र. को. भापकर, हिराबाई भापकर, कॉ. पी.व्ही.कडू पाटील त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेक नावं आहेत की, या जिल्ह्याने त्या विचारसरणीचा आढावा घेऊन समाजामध्ये काम करण्याबद्दलची कामगिरी केली. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूने विकासाच्या आणि विधायक कामातून सुद्धा या घटकांनी लक्ष दिलं. निव्वळ संघर्ष हा सातत्याने करायचा नसतो. अन्याय असेल तर संघर्ष आवश्यक आहे. परंतु विकासाची दृष्टी असली पाहिजे आणि ती दृष्टी असलेल्या नेतृत्वाची मालिका या जिल्ह्यामध्ये होती, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यामध्ये अण्णासाहेब आणि रावसाहेब यांचा उल्लेख हा करावा लागेल.
रावसाहेब आणि आम्ही लोकांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष काम केलं. अनेकदा एकत्र प्रवास केले, विविध प्रश्नांसंबंधी चर्चा केल्या. काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे, खेड्यापाड्यांतील मुलांचा आत्मविश्वास वाढेल असं काम केलं पाहिजे या दृष्टीने पाऊलं टाकली. आज ते नाहीयेत, आज जर असते तर जन्मशताब्दीच्या संबंधीचा सोहळा आपण आनंदाने केला असता. ते नाहीयेत, पण त्यांनी उभं केलेलं काम हे महाराष्ट्राच्या जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, याचा विसर आपल्याला कधी पडणार नाही. मला आनंद आहे की, लहानशा शिक्षण संस्थेचं रोपटं इथं लावलं आणि आज डॉ. राजीव आणि डॉ. प्रेरणा यांनी विस्तारित स्वरूपामध्ये वाटचाल करण्याचा निर्णय घेऊन नवीन वास्तू आज दिली. याचा आपल्या सर्वांना आनंद होतो.
आज या ठिकाणी विवेक सावंत यांचा सन्मान केला. संगणकच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम या देशात केलेल्या व्यक्तींमध्ये विवेक सावंत यांचा उल्लेख हा करावाच लागेल. मला आकडे लक्षात नाहीत, पण काही लाखांमध्ये जी संस्था आपण उभी केली “महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन” जी खऱ्या अर्थाने विस्तारित स्वरूपात महाराष्ट्रासह देशामध्ये वाढवली त्यामध्ये डॉ. सावंत यांचं प्रचंड योगदान आहे. त्या योगदानाबद्दल या संस्थेच्या माध्यमातून काही लाख विद्यार्थी संगणकाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. मला असं वाटतं की, हे जे काम केलं हे भारतापुरते सिमीत नव्हते. मला वाटतं काही आखाती देशांमध्ये सुद्धा त्यांचे विद्यार्थी होते. भारताबाहेर अन्य देशांमध्ये हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींना संगणका संबंधिचं ज्ञान देण्यासंबंधीच्या कामाच्या पाठीमागे डॉ. विवेक सावंत आहेत, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून त्यांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी केला.
जे सांगण्यात आलं ही गोष्ट खरी आहे की, एक काळ असा होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये आम्ही काही लोकांनी ठिकठिकाणी जाऊन लोकांच्यात जागृती तयार करण्याचं काम हे केलं. त्याचं सूत्र एकच होतं तुम्ही शिक्षित आहात की अशिक्षित आहात? जोपर्यंत तुम्ही संगणक शिक्षित होत नाही, मी तुम्हाला शिक्षित म्हणणार नाही. त्यामुळे या सगळ्या क्षेत्राचा विस्तार हा महाराष्ट्रात वाढवण्यासंबंधीची एक मोहीम आम्ही लोकांनी स्वीकारली होती. त्याचा परिणाम इतका झाला की, कधीकाळी सकाळी उठल्यानंतर बायकोसुद्धा सांगायची “हे काय लावलंय तुम्ही? रात्री झोपेत संगणक- संगणक काहीतरी बोलत होतात” याचा अर्थ एकच आहे की, तो विषय डोक्यामध्ये घेतलेला होता. आज त्याची मदत झालेली आहे.
आज आम्ही नवीन काम हातामध्ये घेतलं, ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! ज्याचा उल्लेख सावंत यांनी आपल्या भाषणामध्ये केला. Artificial Intelligence (AI) या तंत्रज्ञानामार्फत अनेक क्षेत्रांमध्ये चमत्कार करता येतील. शेतीच्या क्षेत्रात करता येतील, उद्योगाच्या क्षेत्रात करता येतील, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मेडिसिन्स या भागामध्ये करता येईल आणि हे काम आपण करायचंय. कालच आम्ही लोकांनी पुण्याला ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ येथे एक सभा बोलावली होती. महाराष्ट्रातील १५० कारखाने सहकारी असो किंवा खासगी असो. त्यांचे चेअरमन, कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. महाराष्ट्राचे तीन मंत्री त्या ठिकाणी निमंत्रित केले शेतीमंत्री, अर्थमंत्री यांना त्याच्यात सहभागी केलं. महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.
सुरुवातीला महाराष्ट्रमध्ये आमच्याकडे नोंद झालेले १० हजार शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीमध्ये, पिकांमध्ये आम्ही AI चा सहभाग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचे प्रयोग आम्ही गेले ३ वर्ष करत होतो आणि त्याच्यात आम्हाला यश आलं. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक कारखान्यांमध्ये संस्थांना हे कळवलं की, आम्ही AI चा वापर करून शेती करतो ती बघायला या! त्याचं पीक बघा आणि आज त्या ठिकाणी उभं पीक तुम्हाला बारामतीला बघायला मिळेल. काय फरक आहे? आज आपण ऊस लावतो. सुरुचा ऊस लावतो, आडसालीचा लावतो. एक तर १२ महिन्यांचं किंवा १० महिन्यांचं पीक किंवा एक पीक १६ महिन्यांचं, १८ महिन्यांचं काढता येतं. आम्ही या पिकांचा कालावधी AI मार्फत ९ च्या आसपास आणत आहोत. ९ महिन्यामध्ये ते पीक झालं पाहिजे. तुम्ही जाऊन ते पिक बघू शकाल की, आज तुमच्या दारातला ऊस त्याला कांडी किती असतील? त्याला कांडी असतील ९ ते १२. पण AI च्या मदतीने ऊस लावला त्याची कांडी २० ते २२ इतकी आहे. त्याची उंची ही जवळपास १४ फुटांच्या वर आहे. त्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण हि ३०% नी अधिक आहे. त्याची पाण्याची आवश्यकता नेहमी बोललं जातं की, उसाचं पीक हे अधिक पाणी घेतं. म्हणून हे कमीत कमी पाणी याच्यात कसा सहभाग घेता येईल? आज ही जात AI मार्फत तयार केली त्यामध्ये नेहमी पाणी लागतं, त्यापेक्षा ३० टक्के कमी पाणी, ३० टक्के कमी खतं आणि कमीत कमी ३० टक्के जादा उत्पन्न हा त्यातला अनुभव आहे. हा सगळा चमत्कार हा केवळ या AI च्या माध्यमातून होऊ शकलेला आहे. हे फक्त उसापुरतं नाही, तुम्ही केळीला घेऊ शकता, सोयाबीनला घेऊ शकता, कोकणामध्ये जे पीक घेतात ते घेऊ शकता. अशा अनेक पिकांना आपण या गोष्टीचा सहभाग करून घेऊ शकतो. मला आनंद आहे की, रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये AI संबंधिचं रान नव्या पिढीसाठी आणि त्या शाखेमध्ये AI वर आधारित पीकं घेतल्याची काही उदाहरण घेण्यासंबंधीचा संकल्प केला. तो कार्यक्रम आज रयत शिक्षण संस्था करणार आहे.
मला आनंद एका गोष्टीचा आहे की, महाराष्ट्र सरकारने काल आम्ही सांगितल्यानंतर एक निर्णय घेतला. अर्थमंत्र्यांनी तो त्या ठिकाणी जाहीर केला तो असा आहे की, या क्षेत्रात जे कोणी जातील आणि सुरुवातीला १० हजार शेतकरी घेतले. त्या १० हजार शेतकऱ्यांसाठी लागणारा निधी यातील काही वाटा हा महाराष्ट्र सरकार देईल. त्यासाठी त्यांनी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली, हा महत्त्वाचा निकाल आहे. याबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्याचा अध्यक्ष मीच आहे, तिथूनही आम्ही काही रक्कम घालत आहोत. साखर कारखान्यांनी सुद्धा घालावेत. साधारणतः सुरुवातीला दर हेक्टरी २५ हजार खर्च आहे, आणि दुसऱ्या वर्षापासून तो खर्च जवळपास ९ हजाराच्या आसपास येईल. तेव्हा सुरुवातीचा २५ हा खर्च शेतकऱ्याला झेपणार नाही तिथे महाराष्ट्र सरकार, साखर कारखाने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे तिघे एकत्रित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करतील. जेणेकरून या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे.
माझी खात्री आहे की, रावसाहेब आणि अण्णासाहेब जर असते तर त्यांनी या कामाला प्रचंड प्रोत्साहन दिलं असतं. तेच काम करण्याचा आता मी निर्णय घेतलेला आहे, त्याची सुरुवात आता केलेली आहे. मी नगर जिल्ह्यातल्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या सहकारी मित्रांना त्यातील काही पदाधिकारी काल हजर होते. या सगळ्यांना मी आग्रहाने हे सांगेन की, हा बदलाव शेतीच्या क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान ‘गेम चेंजर’ होणार आहे. हे तंत्रज्ञान शेतीची अर्थव्यवस्था बदलायला हातभार लावणार आहे. त्या सगळ्या कामांमध्ये नगर जिल्ह्यातल्या जाणकार शेतकऱ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि तो राहील, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
याठिकाणी डॉ. प्रेरणाताई आणि त्यांच्यानंतर डॉ. राजीव यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतला. माझी खात्री आहे की, रावसाहेब आज असते तर त्यांना मनस्वी आनंद झाला असता. कारण विधायक कामांमध्ये नेहमीच प्रोत्साहित करायचं, पाऊलं टाकायचे हेच सूत्र रावसाहेबांनी अखंड घेतलं. त्या दृष्टीने हे जे काही या ठिकाणी होतंय, ते त्यांच्या आत्म्याला एक प्रकारचं समाधान देणारं होतंय. त्यासाठी मी राजीव आणि प्रेरणाताई या दोघांचं अभिनंदन करतो.