आशाताई बच्छाव
युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पातून सामाजिक बांधीलकी जोपासावी-प्रा. डॉ. बालाजी कतूरवार
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व संस्कृतीमध्ये दानाला फार मोठी परंपरा असून इतर कोणत्याही दानापेक्षा नेत्रदान, रक्तदान आणि देहदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख तथा रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव प्रा.डॉ. बी. आर. कतूरवार यांनी व्यक्त केले.
देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्रदान ,रक्तदान व अवयवदान याविषयावर जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संजय देबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकप्रशासन विभाग प्रमुख तथा रुग्ण सेवा मंडळाचे सहसचिव डॉ. बालाजी कत्तुरवार हे होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. कत्तुरवार यांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. व्यंकट खंदकुरे यांनी केले.
डॉ. कत्तुरवार यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदान, रक्तदान याबद्दल ची माहिती देऊन त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच इतर दानापेक्षा नेत्रदान ,रक्तदान किती श्रेष्ठ दान आहे, हे सांगितले आणि रक्तदान, नेत्रदान बद्दलचे विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय देबडे यांनी नेत्रदान, रक्तदान ही काळाची गरज असल्याचे सांगून नेत्रदान व रक्तदान करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश क्यादारे यांनी केले तर आभार डॉ.व्यंकट खंदकुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सुरेश काशिदे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी २३ प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ ए. बी. चिद्रावार, कार्यालय अधिक्षक गोविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.