आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी- सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होत
विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी प्रादेशिक सहा संचालक साखर संतोष बिडवई, निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विशेष लेखापरीक्षक आर. एफ. निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,
साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्याचे समाधान होईल, असा दर देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला अधिकची रक्कम देता यावी यासाठी इथेनॉल सारख्या उप उत्पादनाकडे वळण्याचा प्रयत्न करावा. ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर अदा करावी. शेतातील पाचट जाळून ऊस तोडणी करू नये. असे प्रकार आढळल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तर होणार कारवाई
साखर कारखान्यांनी वजन काट्याचे मानकीकरण करून घ्यावे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी काही कारखान्यांना भेट देऊन वस्तुस्थिती तपासावी. भेटीदरम्यान वजन कमी असल्याचे प्रकार लक्षात आल्यास कारवाई करण्यात येईल. वजन करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच ऊसाची वाहतूक करताना वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.




