आशाताई बच्छाव
चिरनेर गावातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे आभार
युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन
चिरनेर गावातील मुख्य रस्ते हे खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले. यामुळे नागरिकांना तसेच गावात ये-जा करणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. चिरनेर गावचे विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेर गावातील उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील यांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून काँक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात केल्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या चिरनेर गावात पेशवेकालीन जागृत श्री महागणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. तसेच १९३० सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली शुरवीरांची भूमी आहे. त्यामुळे या गावात दरदिवशी मुंबई, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण सह इतर तालुक्यातील अनेक पर्यटक, भाविक हे चिरनेर गावाला आपआपल्या कुटुंबासह, मित्र मंडळींसह भेट देत असतात. मात्र, गावातील खड्डेयुक्त रस्ते, वाढते अतिक्रमण यांचा त्रास हा गावातील नागरिकांबरोबर ये-जा करणाऱ्या पर्यटक, भाविकांना सहन करावा लागत असल्याने त्याचा फटका हा गावातील छोटेमोठे व्यवसायिक, कला नगरातील कुंभार बांधवांना सहन करावा लागत असे. यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी यासाठी सातत्याने नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती.
चिरनेर गावच्या सरपंच पदी भास्कर मोकल यांची वर्णी लागताच त्यांनी गावाचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली. चिरनेर गावातील उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकदिलाने ‘माझं गाव आपला विकास’ या भावनेने पिढीत होऊन विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढून गावातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटच्या कामाला आपला हातभार लावत सुरुवात केली. आज चिरनेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.