आशाताई बच्छाव
28 तासानंतर नार पार जलसमाधी आंदोलन स्थगित
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- गुजरातकडे जाणारे पाणी नार-पार-गिरणा योजनेकडून वळवण्याच्या मागणीसाठी माजी खासदार उन्मेष पाटील व शेतकर्यांनी 23 रोजी सकाळी 11 वाजेपासून तालुक्यातील मेहूणबारे येथे गिरणा नदीच्या पूलाजवळ सुरू केलेेले अर्धनग्न जलसमाधी आंदोलन दि 24 दुपारी 3 वाजता तब्बल 28 तासानंतर मागे घेण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कमिशनर यांनी या संदर्भात प्रशासकीय पातळीवर बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी 3 वाजून 10 मिनींटांनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.
नार-पार योजनेला कंेंद्र सरकारने मंजूरी नाकारल्याने खान्देशचा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहणार आसून नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता घेऊन केंद्र शासनाच्याच निधीतून प्रकल्प लवकारात लवकर पूर्ण करून गिरणा खोर्याच्या हक्काचे कमीत कमी 30 टीएमसी पाणी गिरणा खोर्याला मिळालेच पाहीजे अशी मागणी करीत नार-पार-गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या वतीने मेहूुणबारे येथे गिरणा वॉटर पंपिंग स्टेशनजवळील गिरणा पुलाच्या खाली शुक्रवारी सकाळी 12 वाजेपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरूवात झाली.मात्र आंदोलनाबाबत प्रशासन पातळीवरून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत रात्रीही आंदोलन सुरूच ठेवले.
रास्ता रोको
आंदोलनाबाबत कुठलाच तोडगा निघत नसल्याने आंदोलकांनी आक्रमक होत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहतुक ठप्प होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलीसांनी रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले, मात्र आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
पालकमंत्री,जिल्हाधिकार्यांचे आश्वासन
दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व नाशिक विभागीय आयुक्तांनी उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधून नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प संदर्भात लवकरच सचिव पातळीवर बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. उन्मेष पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून तुर्त आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आंदोलकांसह शेतकरी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.