आशाताई बच्छाव
पावसाचा जोर ओसरल्यानं स्थलांतरीत कुटूंबांचं आपआपल्या घरांकडं प्रस्थान !
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
तालुक्यातील पावसाने रविवारपर्यत संततधार ठेऊन सोमवारी काहीशी उसंत मिळविल्यानंतर स्थलांतरीत कुटूंबांनी आपआपल्या घरांकडे प्रस्थान केल्याचे सार्वत्रिक दृश्य दिसून आले. सोमवारी सकाळी 151 मी.मी. पावसाची नोंद झाल्यानंतर दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. यादरम्यान, रविवारी प्रशासनाने दरडीच्या छायेखालील तसेच नदीकिनारी असलेल्या कुटूंबांतील सदस्यांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करण्यास सुरूवात केली होती.
रविवारी पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे, पुरवठा अव्वल कारकून आबासाहेब जगताप तसेच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनीं तालुक्यातील 6 गांवातील 66 कुटूंबांतील 173 सदस्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. गेल्या दोन दिवसापासून पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून सावित्री, कामठी, ढवळी, चोळई नद्यांना पूर आल्यानंतर पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकिनारी तसेच दरडींच्या छायेत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. रविवारी पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील 13 कुटूंबातील 45 सदस्य, कातळी गावातील 10 कुटूंबातील 24 सदस्य, केवनाळे आंबेमाची येथील 12 कुटूंबातील 28 सदस्य, माटवण मोहल्ला येथील 7 कुटूंबातील 20 सदस्य तसेच सवाद येथील 10 कुटूंबांतील 31 सदस्य, साखर सुतारवाडी येथील 9 कुटूंबातील 25 सदस्य असे एकूण 173 व्यक्ती सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केल्यानंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरताच पुन्हा आपआपल्या घरी परतल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दरड कोसळण्याची शक्यता आणि पूरस्थितीची शक्यता दिसून आल्यास या स्थलांतरीत लोकांना पुन्हा सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
2021 च्या केवनाळे येथील भूस्खलनावेळी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या एका कुटूंबातील पाच सदस्य आणि एक व्यक्ती पुन्हा घराकडे परतल्यानंतर जेवणाचा घास घेत असताना दरड कोसळून सहाही जणांना जीवंत समाधी मिळाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांना पुन्हा दरडीच्या धोक्यातील घरांकडे जाण्यास मज्जाव करून प्रशासनाने त्यांची भोजनादी व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.