Home नांदेड राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम

32
0

आशाताई बच्छाव

1000529905.jpg

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 8 जुलै :- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञान वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी मूग,उडीद,ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन या पिकासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर व सोयाबीन ही पिक स्पर्धेतील पिके आहे. या स्पर्धेसाठी पात्रतेच निकष पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक / पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे आहेत.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. मूग,उडीद 31 जुलै. ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन – 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.

बक्षिस स्वरूप
सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी रुपये पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा पातळी तालुका पातळीवर पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये, तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये राहिल, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here