आशाताई बच्छाव
नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी क. स. मा. दे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरला असून, १० जुलैपर्यंत मराठवाडा वगळता बहुतेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. यानुसार राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र, अद्यापही काही भागात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठी शिल्लक असून, पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी नाशिककरांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
ज्या भागात पुरेसा पाऊस झाला आहे. त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीला आणि शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. दरम्यान, आज राज्यासह नाशिक जिल्ह्यातील हवामान कसं असेल, याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. जाणून घेऊयात काय आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोठे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या’ भागांत यलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, बहुतांश भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, देवळा या तालुक्यात डांगी पावसाचा जोर असून, या पावसाचा जोर आता कमी होणार आहे. मात्र, तरीही इतर प्रणाल्यांतून या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, नाशिक जिल्ह्यातील दक्षिण भागात सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.
मालेगाव तालुक्यात केवळ एकदाच पाऊस; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
तर, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा पावसाचे संकट उभे ठाकले असून, येथील शेती पिके संकटात सापडली आहेत. मागील महिनाभरापासून मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस केवळ एकदाच झाला असून, त्याच पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने येथील शेतकऱ्यांच्या नजरा अद्यापही आभाळाकडे लागून आहेत.
पावसाविना पिके करपू लागल्याने जेमतेम पाण्यावर पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ऐन पावसाच्या महिन्यांतही शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट असून विहिर, बोअरवेल, शेततळे या साठवणुकीतील पाण्यातून पीकांसाठी पाणी उपलब्ध केले जात आहे. तर, येणाऱ्या काळात जोरदार पावसाची मालेगावसह इतरही भागातील नागरिकांना प्रतीक्षा असून, नाशिक शहरातील धरणांनीही तळ गाठला असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊसाची गरज आहे.






