आशाताई बच्छाव
वादाचा व्हिडिओ व बातमी व्हायरल – पोलिसांचं कर्तव्य की नागरिकांचा संताप? सत्य समोर आलं!
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ : दिनांक २८ रोजी मुख्य गांधी चौक येथे ट्रॅफिक पोलीस महिला आणि एका वाहनचालक यांच्यात झालेल्या तीव्र वादाचा व्हिडिओ व बातमी समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर प्रसंगाचा व्हिडिओ पत्रकाराने स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून रेकॉर्ड केला आहे.व्हिडिओमध्ये दिसते की ट्रॅफिक पोलीस महिला यांनी त्या वाहनचालकाला अरेरावी आणि संतापपूर्ण स्वरात जाब विचारला. या घटनेनंतर “युवा मराठा न्यूज” या वृत्तसंस्थेमार्फत ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली. बातमी प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला असून संबंधित महिला ट्रॅफिक पोलीसांच्या पतीने स्वयं संपादकांना संपर्क साधत आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, “माझी पत्नी आपल्या कर्तव्यावर होती. वाहन चालकाकडे क्रमांक नसलेले वाहन व कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्याला नियमाप्रमाणे चालान करावं लागणार होतं. परंतु वाहनचालकानेच प्रथम अरेरावी केली आणि धमक्या दिल्या. त्यामुळे संतापाच्या भरात माझ्या पत्नीने प्रत्युत्तर दिलं, मात्र तिचा उद्देश अरेरावी किव्हा असभ्य वागण्याचा नव्हता.”
सदर प्रकरणावर महिला ट्रॅफिक पोलीसांनीही लेखी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की त्यांनी फक्त कायदेशीर कर्तव्य बजावताना वाहनचालकाला थांबविले, मात्र वाहनचालकाने अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेवरून स्पष्ट होते की पोलीस असो वा नागरिक – दोघांनीही रस्त्यावर शिस्त, संयम आणि सभ्यता राखणे आवश्यक आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, परस्पर आदर आणि जबाबदारीने वर्तन करणे हीच खरी सामाजिक शिस्त आहे.






