आशाताई बच्छाव
मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ): आज जागतिक योग दिनानिमित्त पार्थ सैनिकी शाळा, खरपुडी (जालना) येथे योग कार्यक्रम उत्साहात पार पडला. “माय भारत, जालना”, पार्थ सैनिकी शाळा आणि युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. मोहन नेहरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रशुद्ध महत्त्व उलगडून सांगितले. ते म्हणाले, “मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे समतोल शारीरिक आरोग्य प्रदान करणे हे योगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.” त्यांनी योगाभ्यास केवळ शरीराच्या लवचिकतेसाठी नसून, तो संपूर्ण जीवनशैलीसाठी महत्त्वाचा असल्याचे उदाहरणासहित समजावले.
कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षक सुशील कुमार काकडे, सत्येंद्र सिंग बिस्ट व भगवान पडवळ यांनी विविध प्रकारचे योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दिले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत योगशिक्षणाचे अनुकरण केले. सुर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती, ताडासन, वज्रासन इत्यादी योगासनांची सविस्तर माहिती देत, त्याचे आरोग्यावर होणारे फायदे समजावले गेले.
विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जाणिवा निर्माण करणे, त्यांना नियमित योगासाठी प्रेरित करणे आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेस बळ देणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन योगेश बावस्कर व भैय्यासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.