
आशाताई बच्छाव
वादळी वाऱ्याने देगलूर तालुक्यात हाहाकार
वीज कोसळून म्हैस ठार; वीजपुरवठा २० तास ठप्प.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
दि. ८ व ९ जून रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने देगलूर तालुक्यात कहर केला. प्रचंड वाऱ्यामुळे झाडे, विद्युत खांब जमीनदोस्त झाले; अनेकांची घरे उध्वस्त झाली. आकाशीय विजेचा फटका बसून मानूर गावात एक म्हैस ठार झाली. दरम्यान, तब्बल २० तास विद्युत पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.
मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी आलेल्या या वादळी वाऱ्याचा परिणाम देगलूर शहरासह आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवला. देगलूर-उदगीर राज्य महामार्गावरील चाकूर फाट्याजवळ झाड कोसळल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली.
मानूर येथील शेतकरी सायगोंडा गणगोंडा यांची म्हैस आकाशीय विजेने ठार झाली. हावरगा येथील व्यंकट लक्ष्मण गवलवाड, ज्ञानेश्वर व्यंकट गवलवाड, वळग येथील शिवराज केरबा चेरलापल्ले, लिंगनकेरूर येथील आनंद यशवंत कदम यांची घरे कोसळली.
देगलूर शहरात पहाटे दीड ते साडेतीनच्या दरम्यान प्रचंड वारे वाहू लागले. चिद्रावार मिल मैदानात आनंद मेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या झुल्याचे मोठे नुकसान झाले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयासमोर झाड कोसळले, तर लोहिया मैदान परिसरातील शरीफ जनरल स्टोअर्सवरही झाड आडवे पडले.
जुना सराफा मार्केट परिसरात विद्युत तार तुटून जमिनीवर पडली. सावित्रीबाई फुले शाळेजवळील एका घराच्या गॅलरीचा भाग तारांवर कोसळल्याने विद्युत पूल वाकला. देगलूर महाविद्यालयाजवळील परिसरात अनेक जुनी झाडे मोडून पडली. फिरोज दिन टॉकीजजवळ झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.
चमकुमडी, करडखेड, हाणेगाव, मर्खेल परिसरात अनेक घरांचे टीनपत्रे उडाली. करडखेड परिसरात ३३ के.व्ही. लाईनचे ६ ते ७ पोल वाकले, तारा तुटल्या. नवीन बसस्थानकाच्या मागे झाडांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. शहरात अनेक घरांवरील पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. काही नागरिकांच्या प्लॉटमध्ये लावलेली आंबा, पेरू, केळीची झाडे मोडून पडली.
वादळी वाऱ्यामुळे मध्यरात्री दीड वाजल्यापासून तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यंत महावितरणचे कर्मचारी खांब सरळ करणे, तारा जोडणे यांसाठी धडपड करत होते. दरम्यान, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात शेकडो झाडे कोसळल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.