आशाताई बच्छाव
वटपौर्णिमा
मला लहानपणी माझी आई सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगायची.ती कथा मला आकर्षित करीत असे.परंतु मनात अनेक प्रश्न सुध्दा उद्भवत असत.माझी आई सांगायची की, वटपौर्णिमेला लग्न झालेल्या बायका वडाची पूजा करतात.ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्यवती होण्याचा आशिर्वाद मिळतो.परंतु माझ्या मनाला त्यावेळीही हे पटत नसे.खरंच वडाची पूजा केल्याने बायकांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं का? हा प्रश्न मी मोठी झाल्यावरही मनात रुंजी घालत असे.
माझे लग्न झाले तेव्हा मी २३वर्षांची होते.त्यावेळी आम्ही अहमदनगरला स्थायिक झालेले होतो.मी,माझे मिस्टर आणि सासूबाई असे तिघे आम्ही राहत असू. सासरची मंडळी फारच धार्मिक वृत्तीची.मला मात्र या वातावरणाची सवय नव्हती.माझ्या माहेरी फारसे सोवळे ओवळे पाळण्याची सवय मला नव्हती.इथे मात्र अगदीच वेगळे होते.लग्नानंतर एक महिन्याने वटपौर्णिमा आली.मला वडाला पूजने वगैरे काही पटत नव्हते.त्यातही असं केल्याने नव-याला दिर्घायुष्य मिळतं हे तर अगदी थोतांड वाटायचं.परंतु सासुबाई काय म्हणतील जर उपवास केला नाही तर आणि वडाला पूजले नाही तर या विचाराने मनात नसतानाही मी जायचे ठरवले.मनात सत्यवान,सावित्री आणि यमराज यांची कथा आठवत पूजा उरकली.
मी पुढेही अशा अनेक वटपौर्णिमा साज-या केल्या.त्यावेळीही मनात याचा उपयोग काय हाच प्रश्न मनात येत असे.दोन वर्षांपूर्वी आलेली करोनाची लाट खूप भयंकर होती.
कितीतरी सत्यवान आपल्या सावित्रीपासून, मुलाबाळांपासून दूर गेले.कितीतरी सावित्र्या आपल्या नव-यांना परत कधीही पाहू शकणार नाही.काही भाग्यशाली बायका आपल्या नव-यांचे प्राण यमराजकडून वापस आणू शकल्या.त्यावेळी मी काही पुरूष मंडळींना हातात पूजेची थाळी घेऊन वडाची पूजा करतात पाहिले.ही पुरूष मंडळी आपली बायको,आई,बहिण यांचे प्राण वाचावे याकरीता वडाची पूजा करायला आल्याचे पाहिले.
ही गोष्ट मी जेव्हा माझ्या नव-याला सांगितली तेव्हा माझे यजमान म्हणाले,”वडाची पूजा करून सावित्री फक्त आपल्या पतीचेच रक्षण नाही करत तर ती आपले सासू – सासरे,आई- वडील,आपल्या घरातील माणसांच्या दिर्घायुष्यासाठी वर मागत असते.तुला नसेल वडाची पूजा करायची तर राहू दे.माझी कुठलीही जबरदस्ती नाही.नसेल पटत तुला या गोष्टी तर जाऊ दे.तसंही मनाविरुद्ध तू काही करावे असे मला वाटत नाही.”
माझ्या यजमानांनी मला समजून घेतले याबद्दल मला खूप बरे वाटले.मला पटायला लागले की आजही सत्यवान आणि सावित्री या जगात आहेत आणि ती एकमेकांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करतात.माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या यजमानांकडून मला मिळाले होते.त्यात एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे हे समजले.माझे विचार आता बदलले आणि मीच मला ओलांडले.
लैलेशा भुरे
नागपुर