आशाताई बच्छाव
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडी ..! आमदार संजय केळकर यांची पाहणी
ठाणे (अंकुश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा मुंबई ब्युरो चीफ, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल)
ठाणे रेल्वे स्थानक परिसराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी चार पर्याय प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना सुचवले आहेत. लवकरच पोलीस आयुक्तांच्या मंजुरीने प्रायोगिक तत्वावर या पर्यायांची अंमलबजावणी होणार असून नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांची सुटका होणार आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २८ लाखांवर गेली असून रोज १० लाखांहून जास्त प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करतात. त्यातच रिक्षाचालकांची अरेरावी आणि पदपथ-रस्ते अडवणारे बेकायदेशीर फेरीवाले या कोंडीत भर घालतात. त्यामुळे नागरिकांना नाहक मनःस्ताप होतो. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी संजय केळकर यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. आणि स्टेशन परिसराची संयुक्त पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रवाशांची कोंडी कशामुळे होते.
याचे निरीक्षण करण्यात आले आणि चार बदल करण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सध्या असलेला टॅक्सी स्टॅण्ड रेल्वेच्या बाजूला घेतल्यास टॅक्सी स्टॅण्ड परिसर मोकळा होणार आहे. त्यामुळे गोखले मार्गाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाट मोकळी होणार आहे. गोखले मार्गावर कायमस्वरूपी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ते काढून टाकल्यास स्टेशनहून डावीकडे या मार्गाने वाहने जाऊन स्टेशन परिसर मोकळा राहील. मीटर रिक्षाचे चालक त्यांना पाहिजे त्या ठिकाणचेच भाडे घेतात, त्यामुळे अनेक प्रवासी तिष्ठत उभे असतात. तर शेअर रिक्षा चालकांचीही मनमानी सुरू असते. यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचेही प्रमाण मोठे आहे. या रिक्षाचालकांकडून प्रवासीभिमुख सेवा मिळावी यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करण्याची सूचना केळकर यांनी केली.
तर रिक्षा संघटनेच्या कार्यालयाच्या ठिकाणी २४ तास लक्ष ठेवणारी वाहतूक पोलीस चौकी सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या पाहणी दौऱ्यात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार पर्याय सुचवले असून प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्तांसोबत लवकरच या बदलांबाबत संयुक्त बैठक होणार असून त्याबाबत नोटिफिकेशन काढण्यात येईल. हे बदल निश्चितच स्टेशन परिसरातील कोंडी सोडवतील आणि ठाणेकरांना सुरळीत आणि सुरक्षित घरी पोहोचता येईल असा विश्वास संजय केळकर यांनी व्यक्त केला.