राजेंद्र पाटील राऊत
भोर चा पत्ररूपी इतिहास:- मौजे किकवी
भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मध्ययुगात वैयक्तिक, राजकीय, आर्थिक कारणांनी पाटीलकीच्या वतनाचे व्यवहार होत असत. तसाच एक चूकीचा म्हणजे पाटीलकीचा घोटाळा असे म्हणता येईल अशी घटना पुढीलप्रमाणे..
शिवकाळात मौजे किकवी हे गाव परगणे शिरवळ (पूर्वीचे सिरवल) मध्ये होते, येथील पाटीलकी “मंडाजी निगडे पाटील” यांचेकडे होती. ती शके १५९७ म्हणजे इ. स. १६७५ मध्ये “मलारजी” / “मल्हारजी निगडे देशमुख” यांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर (ज्यांनी राजधानी किल्ले रायगड बांधला) यांना परस्पर विकली, त्याची तक्रार मंडाजी निगडे पाटील यांनी शिवछत्रपतींकडे केली. त्यावर निर्णय देताना महाराजांनी हे पत्र बालाजी कुकाजी प्रभू हवालदार व कारकून परगणे सिरवल यांना ०९ सप्टेंबर १६७५ रोजी लिहिले आहे. जुना व्यवहार रद्द करून नवीन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे महाराज आदेश देतात.
महाराज हा व्यवहार रद्द करून मंडाजी निगडे पाटील यांना त्यांची पाटीलकी व हिरोजी इंदुलकरांनी पाटीलकी साठी मल्हारजी निगडे देशमुख यास दिलेली रक्कम परत मिळवून दिली, तसेच मल्हारजीची चूक माफ करून त्यावर मेहेरबानी करून त्यांची देशमुखी देखील त्यांच्याकडे कायम केली. महाराजांना जाणता राजा का म्हणतात हे समजते.
यातून तत्कालीन स्थानिक प्रशासकीय स्तरावरील अपहार आणि शिवछत्रपतींचे आदर्श न्यायधोरण व उत्कृष्ट प्रशासनव्यवस्था स्पष्ट होते.
शिवकालीन ग्रामव्यवस्था व भोरचा इतिहास
ऐतिहासिकभोर सिरवल