राजेंद्र पाटील राऊत
नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांना सापडला अखेर मुहूर्त जिल्ह्यातील 32 रेतीघाटांचा आजपासून लिलाव..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांना अखेर मुहूर्त सापडला असून देगलूर बिलोली व माहूर या तालुक्यातील 32 वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात शनिवारी दिनांक 2 जानेवारी 2021 पासून सुरू होत आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 202 वाळू घाट आहेत. गेल्यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले होते. जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने वाळू घाटांचा लिलाव होऊ शकला नाही. प्रशासनाने अनेक वेळा वाळू तस्करावर कार्यवाही करूनही अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच होता. जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी व त्यांच्या सोबत अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यवाही केल्या होत्या. महसूल पथकाने वाळू घाटात वाळूचे मोठे तराफे जाळून नष्ट केले होते. याशिवाय वाळूमाफिया वर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. ईटणकर साहेबांनी स्वतः ही कारवाई केली होती. यापूर्वी विधानसभा निवडणूक आचार संहिता नंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही वाळू घाट लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दरम्यान या कालावधीत पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील 32 वाळू घाटांचा लिलावास मान्यता दिली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. निवडणूक आयोगाने वाळू घाटांचे लिलाव करण्यास परवानगी देताना ग्रामसभा घेण्यास सांगितले होते. परंतु कुठलाही वाळू स्तराचा लिलाव करण्यापूर्वी त्या गावात ग्रामसभेची मान्यता घेतली जाते. ही प्रक्रिया संबंधित गावात ग्रामसभा घेऊन यापूर्वीच पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील 32 वाळू घाटांचा ई लिलावाची प्रक्रिया चालू केली आहे. 2 जानेवारी पासून सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही प्रक्रिया दिनांक 17 जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे आता वाळूमुळे ठप्प झालेल्या घरकुलांच्या कामांना वेग येणार आहे तसेच सर्वसामान्यांना माफक दरात वाळू मिळेल रखडलेली कामे मार्गी लागतील.