राजेंद्र पाटील राऊत
राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज करण्याचं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई _ राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर माहितीसह अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील, असं कृषीमंत्री यांनी सांगितलं आहे. ( Dada Bhuse appeals to apply at MAHA_DBT port to avail farmers’ schemes)
शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” दिला जाणार आहे. त्यात अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्याचबरोबार त्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता या पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडणं अनिवार्य आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा अनेक माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत.
आधार क्रमांक नसेल तर?
“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे, अशी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.