![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
*ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे लक्ष*
*युवा मराठा न्यूज*
सद्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावरून नेहमीप्रमाणे यंदाही साखर कारखानदार आणि शेतकर्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे; मात्र ही कोंडी लवकरात लवकर फुटण्याची गरज आहे. कारण, गाळप हंगाम लांबला तर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी आणि एकूणच साखर धंद्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात यंदा १०.६६ लाख हेक्टर इतके उसाचे विक्रमी क्षेत्र आहे. त्यातून सुमारे ८.५० कोटी टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. हा सगळा ऊस गाळायचा झाल्यास राज्यातील किमान १८० कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होण्याची गरज आहे; मात्र आजअखेर केवळ १५० कारखान्यांनाच गाळप परवाना मिळाला आहे.
अन्य सुमारे ३० कारखान्यांचे परवाने वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहेत.
उपलब्ध ऊस आणि हंगाम घेणारे कारखाने विचारात घेता यंदा १९० ते २०० दिवस म्हणजे मे महिन्याच्या मध्यापर्यंत कारखाने चालवावे लागतील. उसाचे प्रचंड प्रमाण विचारात घेऊन राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केलेली होती; मात्र पावसासह अन्य कारणांनी अजूनही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होऊ शकलेले नाहीत.
शासनाच्या आदेशानुसार यंदा काही साखर कारखाने अजूनही कोव्हिड सेंटरची उभारणी आणि गेल्या हंगामातील एफआरपीची पूर्तता करू शकलेले नाहीत. कोरोनामुळे ऊसतोडणी मजूर धास्तावले आहेत.
राज्यातील अन्य व्यवसायांप्रमाणेच साखर कारखानदारीही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडलेली आहे. जगभरातील लॉकडाऊनमुळे यंदा साखरेची निर्यात होऊ शकलेली नाही. या साखरेचा उठाव झाल्याशिवाय साखर कारखान्यांच्या हातात खेळते भांडवल उपलब्ध होण्यात अडचणी येणार आहेत. जशा साखर कारखान्यांच्या अडचणी आहेत, तशाच शेतकर्यांच्याही अडचणी आहेत. आधीच राज्यात यंदा उसाचे विक्रमी क्षेत्र आहे. कोरोनाच्या वणव्यामुळे समाजातील अन्य वर्गांप्रमाणे शेतकर्यांचेही अर्थकारण गडबडले आहे. शिवाय अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या कहरामुळे यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस भुईसपाट झाला आहे. त्यांना कोंब फुटू लागले आहेत. या उसाचे लवकरात लवकर गाळप झाले नाही, तर नजीकच्या काळात या उसाची चिपाडे होऊन जाणार आहेत. शिवाय गाळप हंगाम लांबत गेला, तर पाण्याच्या उपलब्धतेअभावी अनेक भागातील ऊस वाळून जाण्याचा धोका आहे.
ही सगळी परिस्थिती विचारात घेता यंदा गाळप हंगाम तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र एकरकमी एफआरपीसह चौदा टक्के दरवाढीची मागणी केली आहे. याबाबतीत समन्वयाने तोडगा काढण्याची गरज आहे.