🛑 नाशिकमध्ये कोरोनाच्या धाकाने सुरु झालेय ” जनता कर्फ्यू “चे लोण 🛑
✍️ नाशिक ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
नाशिक :⭕शहरात सध्या रोज कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे ठराविक भागातील स्थिती कम्युनिटी स्प्रेडसारखी स्थिती बनली आहे. त्यामुळे प्रशासन लॉकडाऊन करण्यास तयार नसल्याने सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वतःच त्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठिकठिकाणी जनता कर्फ्यूचे लोण पसरले आहे.
नाशिक शहराची मुख्य बाजारपेठ तीन दिवसांपासून बंद आहे. या भागातील काही व्यापारी कोरोना बाधीत झाले होते. येथे कामासाठी येणाऱे बहुतांशी कर्मचारी शहराच्या कोरोना संसर्ग झालेल्या भागातून येतात. याशिवाय खरेदीसाठी होणारी गर्दी अनियंत्रीत असल्याने काहीही खबरदारी घेतली जात नसल्याच्या तक्रारी होत्या.
त्याबाबत स्थानिक राजकीय नेते, नागरीक व व्यापारी वर्ग एकत्र येऊन आठ दिवस स्वयंघोषीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची शहरभर चर्चा झाल्याने नाशिक रोड भागात देखील राजकीय नेते एकत्र आले. नगरसेवकांनी बैठक घेऊन त्यात सर्व व्यापारी संघटनांना समाविष्ट केले. तेथे चार दिवसांचा बंद सुरु झाला आहे. त्यामुळे शहरात विविध भागात देखली बंदचे लोण आहे. आता देवळाली कॅम्प, लहवीत गाव, रामदास स्वामी नगर, उपनगर येथे बंद पाळला जात आहे.
शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंचवटीतील रुग्णांची संख्या अधिक असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे “आपण पंचवटीकर’तर्फे आजपासून आठ दिवस “जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. पंचवटी परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पंचवटीतील विविध पक्ष व संघटनांची बैठक दोन दिवसांपूर्वीच लक्ष्मी लॉन्सवर झाली. या बैठकीत संभाव्य बंदबाबत विचारविनिमय होऊन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात बाजार समितीतील संभाव्य गर्दीसह इतर विषयांचा समावेश होता.
यासंदर्भात आमदार राहुल ढिकले म्हणाले, पंचवटी परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिक व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आठ दिवसांच्या “जनता कर्फ्यू’ची हाक दिली आहे. पंचवटी भागातच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे येणारा माल नाशवंत असतो. याशिवाय अधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीसह खते, बी-बियाण्यांची दुकाने सुरूच राहणार आहेत. याशिवाय दवाखाने, औषधांची दुकानेही सुरूच राहतील. पंचवटीतील बंदबाबत शासनाकडून कोणताही सूचना नसल्याने बाजार समितीचे कामकाज सुरूच राहील, असे सचिव अरुण काळे यांनी सांगितले….⭕