![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
🛑 मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 7 जून : ⭕मुंबईच्या पूर्व उपनगरात काल रात्री मोठ्या प्रमाणत गॅसची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात तक्रारी अग्निशमन दलाला आल्या होत्या. अनेकांनी समाज माध्यमातून देखील वायू गळतीची शक्यता वर्तवली होती. या अनुषंगानं अग्निशमन दलाने रात्रभर याचा विविध ठिकाणी शोध घेतला.त्याच बरोबर दक्षता म्हणून ज्या ठिकाणावरून तक्रारी आल्या होत्या तिथे जाऊन दक्षतेबाबत घोषणा करण्यात आल्या. गोवंडी मधील एका औषध कंपनी मधून हा गॅस लिकेज झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली होती. तशी लेखी तक्रार ही केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इथे देखील जाऊन रात्री पाहणी केली. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि घाबरुन न जाण्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईच्या काही भागात पसरलेल्या दुर्गंधीसंदर्भात, आतापर्यंत मुंबई फायर ब्रिगेडने स्टॅंडर्ड कार्यप्रणाली नुसार काम सुरू केले आहे. त्यांनी सांगितलं आहे की, कोणीही घाबरू नका, मी सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन करतो. घराच्या खिडक्या बंद करा. मुंबई महापालिका या परिस्थितीवर नजर ठेवून आहे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अग्निशमन विभाग याचा शोध घेत आहे, लिकेजचा मूळ स्त्रोत सापडताच कळवलं जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे हे यासंदर्भातील प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून आहेत. त्यांनी रात्री 11.50 ते 2.30 वाजेपर्यंत ट्वीट करत या घडामोडींबाबत माहिती दिली आहे.
माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, पवई आदी विभागात रात्री पावणे बारा – बाराच्या सुमारास गॅस गळतीचा वास येऊ लागला होता. गॅसचा उग्र वास येत असल्याने या विभागांमधून मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी नागरिकांनी ट्विटरच्या माध्यमातून नोंदवल्या. गॅस गळतीच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने मुंबई अग्निशमन दलाने आपल्या अनेक गाड्या पाठवत गॅस लिकेजचा शोध घेतला.
चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील रहिवाशांकडून गॅस गळती होण्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दल याबाबत माहिती घेत आहे. आम्ही लवकरच याबाबत माहिती देऊ, असं मुंबई महापालिकेनं सांगितलं आहे.
गॅस गळतीची तक्रार आलेल्या भागात अग्निशमन दलाकडून नागरिकांनी भिऊन न जाता ओला कपडा किंवा ओला रुमाल तोंडाला आणि नाकाला बांधण्याचे तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन महापालिकेकडून केले गेले आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी भिऊन जाऊ नये असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. दरम्यान गॅस गळती कुठे झाली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. त्याचा शोध सर्व यंत्रणांकडून घेतला जात आहे, असं देखील सांगण्यात येत आहे.⭕