🛑 घाबरून वेडंवाकडं पाऊल टाकू नका; कोरोनाप्रमाणे या संकटाला तोंड देऊ – मुख्यमंत्री 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
⭕ “महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर घोंघावणारे निसर्ग चक्रीवादळ हे आता उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. गेल्या काही वर्षातील वादळांपैकी हे सर्वात भीषण वादळ असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासन आपल्यापरिने पुर्ण सज्ज आहे. लष्कर, नौदल आणि एनडीआरफ, एसडीआरफच्या तुकड्या कामाला लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून काही वेडंवाकडं पाऊल उचलण्याची गरज नाही. पुढचे काही दिवस आपण घराबाहेर पडू नका, त्यातच आपले हित असून ज्याप्रमाणे आपण कोरोनाच्या संकटाशी दोन हात केले, त्याप्रमाणेच आपण या वादळादेखील तोंड देऊ”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला धीर दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील प्रशासन वादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहेच. त्याशिवाय
केंद्र सरकार देखील पुर्ण ताकदिनिशी राज्याच्या पाठी आहे. मोदींनी फोन करुन केंद्र सरकार सोबत असल्याचे सांगितले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील केंद्राची मदत असल्याचे सांगितले. तसेच ३ जूनपासून आपण पुनःश्च हरिओम करणार होतो. मात्र आता वादळ येत असल्यामुळे निदान किनाऱ्यालगत असलेल्या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हे वादळ पुर्वीच्या वादळांपेक्षा मोठे असून १०० ते १२५ किमी प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे. मनुष्यहानी किंवा प्राणीहानी होऊच नये, असा प्रयत्न आपण करणार आहोत. मागच्या दोन दिवसांत सर्व मच्छिमारांना समुद्रातून माघारी बोलावले आहे. तसेच पुढचे २ दिवस समुद्रात कुणीही जाऊ नये, असे सागंत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका, असा महत्त्वाचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. या दोन दिवसांत दुरदर्शन किंवा रेडिओवरील बातम्यांवर लक्ष ठेवा, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असेही ते म्हणाले.
तसेच बीकेसी येथे कोविड सेंटर उभे करण्यात आले होते. मात्र वादळाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन याठिाकणच्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वादळाच्या पार्श्वभूमीव नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी?
ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांनी घराच्या आजुबाजुला सुट्या पडलेल्या वस्तू घरात आणून ठेवाव्यात ज्यामुळे त्या उडणार नाहीत किंवा कुणाला लागणार नाहीत.
वादळामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाईल, बॅटरी, पॉवर बँक अशा गोष्टी चार्ज करुन ठेवाव्यात.
वीजेचा अनावश्यक वापर करु नका. बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करुन ठेवा. जेणेकरुन वादळ आल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्यास त्या वापरता येतील.
जिथे मोठे छप्पर किंवा शेड बांधले आहेत. तिथे तुम्ही राहू नका. कारण वादळात ती उडण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात किनाऱ्यालगतच्या घरांत पाणी शिरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करुन टाका.
पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा.⭕