आशाताई बच्छाव
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर पुन्हा दरड कोसळली!
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मागील आठवड्यात सात जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे व ढगफुटीमुळे पायरी मार्गावर दरड आली होती त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा आज महादरवाजा जवळील पायरी मार्गावर दरड आल्याने घडली आहे. मात्र पायरी मार्ग प्रशासनाने बंद ठेवल्याने भीषण दुर्घटना टळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर सात जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे पाण्याचा प्रवाह पायरी मार्गावर येऊन काही ठिकाणी पायरी मार्ग खचण्याची झालेली शक्यता व दरड कोसळू नये यासाठी प्रशासनाने पायरी मार्ग 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे पायरी मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर जाणारा प्रवेश तूर्तास बंद आहे.
किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद असला तरी दोन दिवस बंद ठेवण्यात आलेला रोपवे 11 जुलैपासून पुन्हा पर्यटकांची व प्रशासनातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुन्हा चालू केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे पायरी मार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांना बंदी आहे. मात्र रायगड किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आज दिवसभरात जास्त असल्याने रायगड किल्ल्यावर महादरवाजाजवळील भागात ही दरड कोसळली मात्र या दरडीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी पर्यटकांना त्या पायरीवर मार्गावरून जाणे बंद केल्याने भीषण दुर्घटना टळली आहे.
रायगडावर पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्याची गरज!
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी होते त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर धबधब्याने तसेच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याने व पायरी मार्गाने येते याची कल्पना प्रशासनाला पूर्वीपासूनच आहे. मात्र त्यावर कोणती अंमलबजावणी करायची व त्यातून काय उपाय काढायचा तसेच पर्यटकांच्या दृष्टिकोनातून रायगड किल्ल्यावर पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
यासाठी किमान पावसाळ्यात तरी रायगड किल्ल्यावर प्रशासकीय यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपली यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना व शिवभक्तांना त्याचा उपयोग होईल मात्र या गोष्टी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहित असताना ते याबाबतचा आपला अहवाल राज्य व केंद्र शासनाला का सादर करत नाहीत केवळ कागदोपत्री घोडे नाचणाऱ्या प्रशासकीय व केंद्रीय पुरातत्व विभागाला रायगडचे महत्त्व वाढवायचे नाही का असा सवाल या भागातील असंख्य स्थानिक ग्रामस्थांकडून व शिवभक्तांसहित पर्यटकांकडून विचारला जात आहे.