आशाताई बच्छाव
पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला!; संग्रामपूर पत्रकार संघाचा मुख्यमंत्र्यांना ठणकावला इशारा
टोल कंपनीला ब्लॅकलिस्ट करा; पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी
✍🏻स्वप्निल देशमुख बुलढाणा
संग्रामपूर :-लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर वाढते हल्ले ही लोकशाहीला थेट गळचेपी करण्याची प्रवृत्ती असून, राज्य सरकारने यावर कठोर भूमिका घ्यावी, अशा प्रखर शब्दांत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे ठणकावून इशारा दिला आहे.
नुकत्याच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टोल नाक्यावर तीन ते चार पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा निषेध करत, पत्रकार संघाने सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार प्रशांत पाटील आणि तामगाव पोलीस ठाणेदार पंडित सोनवणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित टोल कंपनी ए.एस. मल्टी सर्व्हिसेस यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून ती कंपनी राज्यभरात ब्लॅकलिस्ट करण्यात यावी. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघाने दिला आहे.
पत्रकार संरक्षण कायदा २०१९ पासून अस्तित्वात असूनही आजवर ३०० हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले; मात्र केवळ ४३ प्रकरणांतच या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. सरकारकडून होत असलेल्या कुचराईचा निषेध करत या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी संघाने केली.
यासोबतच, गृहमंत्रालयाने पत्रकार हल्ला प्रकरणांची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करावी, तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सचिव असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या स्थापन करण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
सदर निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, सचिव विवेक राऊत, ता.उपाध्यक्ष अब्दुल भाई, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, जिल्हा समिती सदस्य श्याम देशमुख, पत्रकार हल्ला कृती समिती सदस्य स्वप्निल देशमुख, तालुका सहसचिव शेख रफिकभाई, दयालसिंग चव्हाण, दीपक चोपडे, विठ्ठल निंबोळकार, अमोल ठाकरे, डिजिटल मीडिया सचिव निलेश तायडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून उपस्थिती दर्शवली.