आशाताई बच्छाव
हिंजवडी एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे निवासी संपादक उमेश पाटील
पुण्यातील हिंजवडी परिसरातून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून या प्रसिद्ध आयटी हबमधून आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच आणखी एक गंभीर घटना हिंजवडी फेज-1 मध्ये घडली आहे. येथे एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणाचे नाव पीयूष कवडे असून, तो ॲटलास कॉपको या कंपनीत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. पीयूषने ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी दि. 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. यात “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका”, असं त्याने म्हटले आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पीयुषने टोकाचं पाऊल उचलल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं
गेल्या वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनियर म्हणून पीयूष कवडे हा नोकरी करत होता. त्याचा पगार देखील चांगला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मिटींगमधून सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. पीयुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यानंतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली का? यावर देखील पोलीस तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण समोर आलं नसलं तरी वैयक्तिक कारणांतून पीयूषने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.