आशाताई बच्छाव
पुण्यात सार्वजनिक कानबाई उत्सवाचे आयोजन;
(भव्य आयोजनासाठी खान्देशी समाज एकवटला)
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
पिंपरी चिंचवड शहरामध्ये यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरा होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी, प्राधिकरणातील खान्देश मराठा मंडळ सभागृहात विविध खान्देशी समाज मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक कानबाई उत्सव आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत सर्व समाज बांधवांना समान जबाबदारी देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यावर भर देण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात खान्देशी समाजाचा प्रभाव वाढावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच, यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेता खानदेश कर श्री नामदेवराव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच, या सार्वजनिक उत्सवासाठी खान्देशातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची कानबाई उत्सव समिती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीत, पुणे व पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व खान्देशी मंडळांचा एक संयुक्त गट तयार करून नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर चर्चा झाली. यामुळे उत्सवाला एक व्यापक स्वरूप मिळेल, अशी आशा व्यक्त करून उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य मिरवणूक काढण्यात यावी. याद्वारे समाजात एकोपा वाढवून चुकीच्या विचारसरणीला सकारात्मक उत्तर देण्याबाबत भर देण्यात आला. प्रसंगी, विविध खान्देशी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करून सामाजिक कार्यात योगदान वाढवण्यावर चर्चा झाली. सार्वजनिक कानबाई उत्सवाला एक सकारात्मक थीम देण्यासोबतच, लग्न समारंभांमधील अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी खान्देशी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. कानबाई मातेचे महत्त्व नवीन पिढीला समजावून देण्यासाठी महिला आणि तरुण वर्गाला उत्सवाची जबाबदारी देण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. यंदाचा सार्वजनिक कानबाई महोत्सव “गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये नोंद झालेली पाहिजेल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी हजारो-लाखो लोकांच्या संख्येने कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.कानबाई माता उत्सव हा खान्देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लोकपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये या महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणारा हा उत्सव पाच ते सात दिवस चालतो, ज्यात कानबाईची मूर्ती किंवा प्रतीकात्मक वस्तूंची स्थापना करून पूजा केली जाते. महिलावर्ग यात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती, भजन आणि कानबाईची गाणी म्हटली जातात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कानबाई मातेच्या मूर्तीचे नदी किंवा जलाशयात विसर्जन केले जाते. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन “कानबाई माता की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो.
पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांमुळे या उत्सवाचा विस्तार होत आहे. हा कानबाई महोत्सव पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी समाजाच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीला खान्देशातील सर्व समाज मंडळाचे पदक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…