
आशाताई बच्छाव
वाशिमचा दुहेरी सन्मान! जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांना प्रथम, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ -२६ मार्च २०२५: जिल्ह्यासाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला आहे! महाराष्ट्र शासनाच्या “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५” अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली असून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी बजावली गेली आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी ‘मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्ष सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळवला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम’ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन चिया सीडच्या उत्पादनाचा नाविन्यपूर्ण प्रयोग, नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची निर्मिती आणि सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला. या प्रभावी उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली असून, वाशिम जिल्ह्याने राज्यभरात आपली छाप उमटवली आहे.
पोलीस अधीक्षकांचाही सन्मान :
वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्षाची सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळवला आहे. त्यांना ६ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले असून, ही रक्कम कार्यालयीन सुधारणा आणि नव्या प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे. या यशाने पोलीस दलाच्या समर्पणाचेही कौतुक झाले आहे. जिल्ह्याचा गौरव या दुहेरी यशामुळे जिल्हा राज्याच्या नकाशावर झळकला आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने दाखवलेली कार्यक्षमता आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन यामुळे वाशिमवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या यशात उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि गटविकास अधिकारी रविंद्र सोनुने यांच्या उल्लेखनीय कार्याचा आणि सहकार्याचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी विशेष अभिनंदन केले आहे. हे यश जिल्ह्याच्या प्रगतीचा पाया मजबूत करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदी उपस्थित होते.