आशाताई बच्छाव
तीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू
सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)
वटार (बागलाण) : येथील तीन वर्षीय बालकाचा सोमवारी (दि. 24) रोजी पहाटे झोपेतच सर्पदंशाने मृत्यू झाला.
माजी सरपंच ज्ञानदेव खैरनार यांचा नातू स्वराज सागर खैरनार हा डोंगरेज शिवारातील शेतातील घरात झोपला होता. पहाटेच्या सुमारास तो जोरात रडल्याने पालकांना जाग आली. त्यावेळी त्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच विरगाव आरोग्य केंद्रात आणले. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यास सटाणा येथे नेत असताना तो बेशुद्ध झाला. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
वेळेवर उपचार झाले असते तर वाचला असता जीव
येथून जवळच असलेल्या विरगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे औषधोपचार कसे करणार? असा प्रश्न होता त्यामुळे त्याला सटाणा येथे हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेल्याने बालकाचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य औषधोपचार आणि सुविधा मिळाली असती तर एकुलता एक स्वराजचे प्राण वाचले असते अशी भावना व्यक्त होत आहे.
नियतीच्या मनात वेगळेच
स्वराजचा रविवारी (दि.23) रात्री मोठ्या थाटामाटात तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यास शुभाशीर्वाद दिले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. वाढदिवस साजरा झाल्यानंतर काही तासातच पहाटे चार वाजेच्या पूर्वी त्यास सर्पदंश झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पहाडी नागाचा दंश
स्वराजला दंश करणारा सर्प त्याच खोलीत दडून बसला होता. त्यामुळे सर्पमित्र देवा वाघ यास बोलविण्यात आले. त्यांनी स्वराज झोपलेल्या पलंगाखालीच दडून बसलेल्या सर्पाला पकडले. तो अतिविषारी पहाडी नाग असल्याचे लक्षात येतातच त्यास शिताफिने पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले.