आशाताई बच्छाव
जुनी पेन्शन संघटनेचा पुन्हा महाएल्गार, कर्मचारी पेन्शनसाठी आक्रमक पवित्रा घेणार
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची विचार सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 24/06/2024
याविषयी सविस्तर असे की, दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची राज्यसहविचार सभा संपन्न झाली. यावेळी शासनाने तात्काळ पूर्वीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी अन्यथा लढा आणखी तीव्र होईल व कर्मचाऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा आक्रमक पवित्रा संघटनेतर्फे घेण्यात आला.
विशेष म्हणजे कर्मचारी सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येते, आणि जे शिक्षक कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात त्यांना शासन पेन्शन नाकारत आहे.अशा वेळी शिक्षक -कर्मचारी यांनी पेन्शनसाठी आत्महत्या कराव्यात अशी शासनाची इच्छा आहे का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.यासाठी शासनाने शिक्षक -कर्मचारी यांना ईच्छा मरणाची परवानगी द्यावी म्हणजे पेन्शनसाठी शिक्षक,कर्मचारी आत्महत्या करतील आणि आपल्या कुटुंबियांना सरकार पेन्शन देईल.अशी वेळ पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षक- कर्मचाऱ्यांवर आली आहे.ही बाब निश्चितच खेदजनक असल्याची प्रतिक्रिया या सभेच्या निमित्ताने पहायला मिळाली आहे.
प्रत्येक वेळी आंदोलनादरम्यान शासनाने फक्त आश्वासने पदरात टाकून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.यावेळी मात्र शासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून जशीच्या तशी 1982 ची जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी तरच हा लढा थांबेल. कारण लोकसभेच्या निवडणुका नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्येही राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या बघता हा रोष सरकारला परवडणारा नाही. सदर सहविचार सभेत राज्य, विभाग व जिल्हा पदाधिकारी यांनी आपापली मते मांडली सर्व कर्मचारी वर्गाने येणाऱ्या काळात कुठल्या रणनीती द्वारे जुनी पेन्शन प्राप्त करता येईल यावर सविस्तर चर्चा केली व चर्चेअंती सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की, येणाऱ्या कालावधीमध्ये पुढील प्रकारे संघटनेची रणनीती व कृती कार्यक्रम ठरवण्यात आला.1) जुलै महिन्यात राज्यभर पेन्शन साठी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे,2) तसेच ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन, 3) सर्व 288 आमदारांची व नवनिर्वाचित खासदार यांच्या पेन्शन संदर्भात भेटी,4) सर्व संघटना यांना सोबत घेऊन संपा संदर्भात त्वरित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
तरुण कर्मचारी जुन्या पेन्शन साठी आता आक्रमक झाले आहेत
शासनाने आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कारण तरुण कर्मचारी आता भविष्य सुरक्षित करण्यासाठी आक्रमक झाला असून वेळ पडल्यास संपाचे हत्यार उपसले जाऊ शकते व त्यामुळे सर्व यंत्रणा ठप्प पडतील हे सर्व टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन लागू करावी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही पेन्शन मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर सर्व जिल्ह्यांमध्ये जुनी पेन्शन संघटना स्वतः येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या हक्कासाठी लढेल.
-वितेश खांडेकर राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.
भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा
जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो प्रदान केलाच पाहिजे. शासनाने कर्मचारी यांच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा संप करून सर्व कर्मचारी आपली ताकद शासनास दाखवून देतील. 18 लाख कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
-गोविंद उगले, जुनी पेन्शन संघटना